
चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील जनतेला लवकरात लवकर मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. आम्ही पूर्वी म्हणत होतो, आरामात मुले जन्माला घाला. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. यामुळे लवकरात लवकर मुले जन्माला घालणे आवश्यक आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
स्टॅलिन म्हणाले, राज्यात लोकसंख्येवर आधारित मतदारसंघांची पुनर्रचना (सीमांकन) झाल्यास राज्यातील लोकसभेच्या जागा कमी होऊ शकतात. परिणामी, राज्याचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल. तमिळनाडूची यशस्वी फॅमिली पॉलिसी प्लॅनिंग आता राज्यासाठी हानिकारक ठरताना दिसत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
नागापट्टीणम जिल्ह्याच्या पक्ष सचिवांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी स्टॅलिन आले होते तेव्हा त्यांनी राज्यातील जनतेला वरील आवाहन केले आहे. स्टॅलिन म्हणाले, राज्यात लोकसंख्येवर आधारित मतदारसंघांची पुनर्रचना (सीमांकन) झाल्यास राज्यातील लोकसभेच्या ८ जागा कमी होऊ शकतात. परिणामी, राज्याचे राजकीय प्रतिनिधित्व कमी होईल, असेही स्टॅलिन म्हणाले.
सर्वपक्षीय बैठक
स्टॅलिन यांनी तमिळनाडूच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी ५ मार्चला एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यासाठी सर्व पक्षांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. एवढेच नाही, तर या मुद्द्यावर आपण एकत्रित येऊन आपल्या अधिकाराचे रक्षण
करायला हवे, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
कुटुंब कल्याण धोरणामुळे राज्याचे नुकसान
फेब्रुवारी २५ रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर स्टॅलिन यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. स्टॅलिन म्हणाले होते, तमिळनाडूमध्ये कुटुंब कल्याण धोरण यशस्वीपणे लागू केल्याने आता राज्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर लोकसंख्या जनगणनेच्या आधारे सीमांकन करण्यात आले, तर तामिळनाडूला आठ खासदार गमवावे लागतील. यामुळे संसदेत तमिळनाडूचे प्रतिनिधित्व कमी होईल.
मतदारसंघांची पुनर्रचना अथवा सीमांकन करण्यासाठी एक आयोग स्थापन केला जात असतो. यापूर्वी १९५२, १९६३, १९७३ आणि २००२ मध्येही आयोग स्थापन करण्यात आले आहेत.