एकच मंत्र-काटकसर! मोदींच्या ताफ्यात आता फक्त दोन मोटारी, राज्यातील मंत्र्यांचे ताफे निम्म्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काटकसरीचे आवाहन सर्वत्र काटकसरीचा मंत्र ऐकू येऊ लागला आहे. केंद्र सरकार व सर्व राज्य सरकारांनी मोटारीचे ताफे कमी करणे, विदेश प्रवास रद्द करणे असे उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. या बदलाची सुरुवात खुद्द मोदी यांनी स्वतःपासून केली असून पंतप्रधानांच्या ताफ्यात यापुढे केवळ दोनच गाड्या असतील.
एकच मंत्र-काटकसर! मोदींच्या ताफ्यात आता फक्त दोन मोटारी, राज्यातील मंत्र्यांचे ताफे निम्म्यावर
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काटकसरीचे आवाहन सर्वत्र काटकसरीचा मंत्र ऐकू येऊ लागला आहे. केंद्र सरकार व सर्व राज्य सरकारांनी मोटारीचे ताफे कमी करणे, विदेश प्रवास रद्द करणे असे उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. या बदलाची सुरुवात खुद्द मोदी यांनी स्वतःपासून केली असून पंतप्रधानांच्या ताफ्यात यापुढे केवळ दोनच गाड्या असतील. प्रशासकीय खर्चावर नियंत्रण मिळवणे आणि सार्वजनिक पैशांची बचत करणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेते जे. पी. नड्डा यांनीही आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे.

विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवेळीही अशाच प्रकारे मर्यादित ताफा वापरण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष सुरक्षा दलाने (एसपीजी) सुरक्षेच्या सर्व पैलूंचा फेरआढावा घेतला आहे. या आढाव्यानंतर सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करणे शक्य असल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी पंतप्रधानांच्या प्रवासासाठी डझनाहून अधिक गाड्यांचा वापर केला जात असे, ज्यामध्ये अनेक 'डमी' गाड्यांचाही समावेश असायचा. आता मात्र ताफ्यात केवळ दोनच गाड्या असतील.

या कपातीमुळे केवळ इंधनाचीच बचत होणार नाही, तर ताफ्यातील इतर गाड्यांच्या देखभालीवर होणारा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. देशातील इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा ताफ्यांबाबतही अशाच प्रकारचे धोरण राबवण्याचे संकेत मिळत आहेत.

पंतप्रधानांच्या आवाहनाला केंद्र सरकारमधील मंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांनी त्वरित प्रतिसाद दिला आहे. अनेक मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या घटवली आहे. तसेच, अनेक महत्त्वाच्या बैठका आता ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या ताफा कमी करण्यासह इतर उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. नितीन गडकरी तसेच राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही यापुढे बसने जाण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलाचे भाव वाढणार?

दरम्यान, युध्द पातळीवरील काटकसरीच्या या उपायांमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात विविध अटकळींना उधाण आले आहे. काही जणांच्या मते, येत्या काही दिवसांत इंधन वापराबाबत काही निर्बंध लादले जाऊ शकतात. तर काहींच्या अंदाजानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलेल्या विधानाने या चर्चाना बळकटी आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in