दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत देशवासीयांना एक खास पत्र लिहिले आहे. स्वदेशी स्वीकारा, प्रत्येक भाषेचा आदर करा, आरोग्याला प्राधान्य द्या, यासह मोदींनी पत्रामध्ये ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली: देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देत देशवासीयांना एक खास पत्र लिहिले आहे. स्वदेशी स्वीकारा, प्रत्येक भाषेचा आदर करा, आरोग्याला प्राधान्य द्या, यासह मोदींनी पत्रामध्ये ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला आहे.

प्रभू रामचंद्रांची शिकवण या पत्राच्या माध्यमातून मोदींनी जनतेशी संवाद साधत दिवाळीचा सण ऊर्जा, उत्साह आणि देशाच्या कामगिरीवर चिंतन करण्याचा काळ असल्याचे म्हटले आहे. मोदींनी पत्राच्या माध्यमातून देशवासीयांना फक्त दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, तर स्वदेशी, आरोग्याला प्राधान्य आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबतही त्यांनी भाष्य केले. तसेच अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर ही दुसरी दिवाळी असल्याचे सांगत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धार्मिकता आणि धैर्य यावरील श्रीरामांच्या शिकवणींचा संदर्भही मोदींनी सांगितला.

मोदींनी पत्रात म्हटले की, दिवाळीच्या सणानिमित्ताने तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा. अयोध्येत राम मंदिराच्या भव्य बांधकामानंतरची ही दुसरी दिवाळी आहे. भगवान श्रीराम आपल्याला धार्मिकतेचे रक्षण करायला शिकवतात, तसेच अन्यायाविरुद्ध लढायलाही शिकवतात. याचे एक ज्वलंत उदाहरण आपण काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाहिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने अन्यायाचा बदला घेतला, असे मोदी यांनी म्हटले आहे.

स्वदेशी स्वीकारा

अनेक संकटांचा सामना करणाऱ्या जगात आपला भारत स्थिरता आणि संवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून ठाम उभा आहे. भविष्यात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सज्ज आहोत. विकसित आणि स्वावलंबी भारताच्या या प्रवासात नागरिक म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी राष्ट्राप्रति असलेली आपली कर्तव्ये पार पाडणे आहे. आपण स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे आणि अभिमानाने सांगितले पाहिजे. एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेला प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे, स्वच्छतेचे पालन केले पाहिजे, आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे, आपल्या अन्नातील तेलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी केले पाहिजे आणि योगासने केली पाहिजेत, हे सर्व प्रयत्न आपल्याला अधिक वेगाने विकसित होणाऱ्या भारताकडे घेऊन जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.

हजारो कोटी रुपये वाचले

काही दिवसांपूर्वी जीएसटीबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीचे कमी दर लागू झाले आहेत. जीएसटीच्या बचत महोत्सवामुळे देशवासीयांच्या हजारो कोटी रुपयांची बचत होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे,

दिवाळी खास, कारण...

मोदींनी पुढे म्हटले की ही दिवाळी खास आहे. कारण देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये, दुर्गम भागात पहिल्यांदाच दिवाळीचे दिवे लावले जातील. हे असे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी नक्षलवाद आणि माओवाद्यांचा नायनाट करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात आपण पाहिले असेल की किती नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. त्यांनी देशाच्या संविधानावर विश्वास व्यक्त केला आहे ही देशासाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे.

logo
marathi.freepressjournal.in