पुढचा अजेंडा- 'एक देश, एक निवडणूक'; देशात सकारात्मक चर्चा सुरू - मोदी

देशात सध्या समान नागरी कायदा (यूसीसी) आणि एक देश-एक निवडणूक यावर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना आभासी पद्धतीने संबोधित करताना स्पष्ट केले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रX
Published on

नवी दिल्ली : देशात सध्या समान नागरी कायदा (यूसीसी) आणि एक देश-एक निवडणूक यावर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना आभासी पद्धतीने संबोधित करताना स्पष्ट केले. यूसीसी आणि आणि 'एक देश, एक निवडणूक' हे विषय भाजपच्या अजेंड्यावरील महत्त्वाचे 'अधुरे कार्य' असल्याचेही मोदी म्हणाले.

भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "भाजप कार्यकर्त्यांनी आणीबाणीसारख्या कठीण काळाचा सामना केला असून काँग्रेसच्या राजवटीत अनेक संकटे झेलली आहेत.पश्चिम बंगाल आणि केरळसारख्या राज्यांचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, "या राज्यांमध्ये हिंसाचाराला राजकीय संस्कृतीचे स्वरूप दिले गेले आहे. तेथे अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.

भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जिथे कार्यकर्ता पक्षाला आपली माता मानतो. म्हणूनच पक्षाचा स्थापना दिन हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून प्रत्येक कार्यकर्त्यासाठी तो एक भावनिक क्षण आहे, असे मोदी यांनी नमूद केले. देशासमोर असलेल्या प्रत्येक आव्हानाचा भाजप खंबीरपणे सामना करत असून, भविष्यातही याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अधुरे संकल्प

'एक देश, एक निवडणूक' (लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणे) आणि 'समान नागरी कायदा' (विवाह, दत्तक विधान इत्यादींसाठी सर्वांना समान कायदा) यावर देश सकारात्मक दिशेने पुढे जात आहे. ब्रिटिश काळातील कालबाह्य कायदे रद्द करणे, नवीन संसद भवनाची उभारणी, सवर्णांमधील गरिबांना १० टक्के आरक्षण, तिहेरी तलाक बंदी, सीएए आणि अयोध्या राम मंदिर निर्मिती ही भाजपच्या प्रामाणिक प्रयत्नांची फळे असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in