
मधुबनी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले असून तसे स्पष्ट संकेत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधून दिले. ‘मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याची आणि त्यांच्या पाठीराख्यांची ओळख पटवून त्यांचा कसून माग काढेल आणि त्यांना कठोर शिक्षा करेल. ज्यांनी हा हल्ला केला आहे, त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचे कटकारस्थान रचणाऱ्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी मोठी शिक्षा मिळेल, असा दृढनिर्धार नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
बिहारच्या मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायतराज दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीरसभेत ते बोलत होते. दहशतवादविरोधात संपूर्ण जगाला इशारा देण्यासाठी मोदींनी थेट इंग्रजीतून भाषण केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदी यांनी दोन मिनिटे मौन पाळून या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली, तर भाषण संपता संपता त्यांनी दहशतवाद्यांना जाहीर भाषणातून थेट इशारा दिला. देशाच्या आत्म्याला दुखावणाऱ्या दहशतवाद्यांना कोणत्याही किमतीत सोडले जाणार नाही, असे मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे
‘त्यांचा’ पृथ्वीच्या अंतापर्यंत माग काढणार
आता दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार आहे. बिहारच्या मातीत उभे राहून मी जगाला सांगू इच्छितो की, भारत या दहशतवाद्यांची ओळख पटवून त्यांचा पृथ्वीच्या अंतापर्यंत माग काढेल आणि त्यांना त्यांच्या कृत्याची भीषण शिक्षा देईल, दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो, असेही मोदी म्हणाले.
देशाच्या आत्म्यावर हल्ला
पहलगाम हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश दुःखी आहे. सर्व पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सगळा देश त्यांच्यासोबत उभा आहे. ज्यांच्यावर उपचार चालू आहेत ते लवकर बरे व्हावेत यासाठीही सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा, भाऊ आणि जोडीदार गमावला. त्यातील प्रत्येक जण वेगवेगळे भाषिक होते. आपल्या सर्वांचे दुःख, आक्रोश एकसारखा आहे. हा हल्ला फक्त पर्यटकांवरच झाला नाही तर देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.