साता समुद्रापलीकडील देशांमध्ये भारताबद्दल भीती! सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेला टॅरिफवरून सुनावले

भारत जर मोठा झाला तर आमची स्थिती कशी असेल, आमचे काय होईल, ही भीती जगातील काही देशांच्या मनात असल्यामुळे त्यांनी आपल्यावर टॅरिफ लागू केला आहे, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले.
साता समुद्रापलीकडील देशांमध्ये भारताबद्दल भीती! सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेला टॅरिफवरून सुनावले
एएनआय
Published on

नागपूर : भारत जर मोठा झाला तर आमची स्थिती कशी असेल, आमचे काय होईल, ही भीती जगातील काही देशांच्या मनात असल्यामुळे त्यांनी आपल्यावर टॅरिफ लागू केला आहे, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादले. तसेच रशियाकडून तेल खरेदी केल्याचा मुद्दा उपस्थित करत भारतावर तब्बल ५० टक्के कराचे (टॅरिफ) ओझे टाकले. तसेच ट्रम्प यांनी अनेकदा भारताला टॅरिफच्या मुद्द्यांवरून डिवचण्याचाही प्रयत्न केला. यावरून मोहन भागवत यांनी अमेरिकेला सुनावले आहे.

तुकाराम महाराजांचा उल्लेख

तुकाराम महाराज म्हणत होते, कोणी वंदा कोणी निंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. जगाचे भले करणे यात आमचे स्वहित असून तो आमचा स्वार्थ आहे. मात्र, स्वतःला शरीर मन, बुद्धीत कैद करून बसले तर हेच माणसामाणसातील आणि देशादेशातील भांडणाचे कारण ठरते. मला काय हवे हा विचार प्रत्येकाच्या मनात येतो आणि जगाला काय द्यायचे याचा आपल्याला विसर पडतो. त्यामुळे आपलेपणाची भावना असेल तर कोणातच वाद निर्माण होणार नाही, असे ते म्हणाले.

अनेक जण स्वतःला मोठे करण्यासाठी लढत असतात. मात्र हे करत असताना शक्तिशाली देशही स्वतःला मोठे करण्यासाठी इतरांना कमजोर करण्याचा कुत्सित प्रयत्न करतात. वर्तमान काळाव्यतिरिक्त आपण प्राचीन काळाचाही विचार केला असता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनीही भारताला शक्तिशाली आणि मोठे करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांचा उद्देशही आपल्याला जगाला काहीतरी द्यायचे म्हणून भारताला मोठे बनवणे हाच होता, असेही ते म्हणाले.

भारत सर्वव्यापी

भारताला काही बनायची गरज नाही. भारत आधीपासूनच सर्वव्यापी आणि शक्तिशाली आहे. भारतामध्ये राहणाऱ्या लोकांना आता सर्वव्यापी आणि शक्तिशाली बनवायचे आहे. व्यक्तीमध्ये शील आणि चरित्र निर्माणाचे काम ब्रह्मकुमारी करतात. माणसाच्या आतमध्ये असलेल्या दैवत्वाला जागवण्याचे काम ब्रह्मकुमारी करतात. संघाचे काम याप्रमाणेच आहे. १४२ कोटी लोकसंख्येचा आपला देश आहे. यात विविध धर्म, पंथ, संप्रदाय आहेत. या सर्वांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यामुळे आज देश भक्कमपणे उभा आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.

राष्ट्र म्हणून भारताचे वेगळे अस्तित्व

राष्ट्र म्हणून भारताला एक स्वतःची ओळख आहे. आम्हाला काय करायचे हे आम्हाला माहिती आहे. अनेकदा ज्या समस्या निर्माण होतात त्यावर उपाय शोधणे, ते दूर करणे हेच आमचे कर्तव्य आहे. हे भारताला माहिती आहे. ही भावना आता प्रत्येक भारतीयामध्ये जागृत करणे आपले काम आहे. त्यामुळे आपले कर्तव्य काय भारताला नक्की माहिती आहे. आज मी सरसंघचालक असल्यामुळे माझ्या भाषणाला महत्त्व आहे. त्यामुळे आपण सगळे निमूटपणे भाषण ऐकत आहात. जगामध्येही ज्या व्यक्तीला महत्त्व आहे त्याचेच सगळे ऐकतात. त्यामुळे सगळे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

logo
marathi.freepressjournal.in