

नवी दिल्ली : नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुढील दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपल्या ताज्या अंदाजात म्हटले आहे. सामान्यतः भारतातील मान्सूनचा हंगाम १ जूनच्या सुमारास सुरू होतो आणि १५ जुलैपर्यंत संपूर्ण देशभर पोहोचतो. तसेच‘पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, लक्षद्वीप बेट समूह, तसेच केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागांत नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे’.
मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचू शकतो. तथापि, विभागाने यावर्षी मान्सून सामान्यपेक्षा कमकुवत राहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. हवामान विभागाने सांगितले की जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्र, कर्नाटकात आज जोरदार वारे
दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये मंगळवारी जोरदार वारे वाहण्याची आणि वीजेच्या चमचमाटाची शक्यता आहे.तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि कर्नाटकच्या अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये मुसळधार पाऊसही पडू शकतो. ईशान्येकडील राज्ये आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही पाऊस आणि वादळी वाऱ्याचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.