

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा गुरुवारी केरळमध्ये आगमन होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सर्वसाधारणपणे मान्सून १ जूनपर्यंत केरळममध्ये दाखल होतो. यंदा मात्र पोषक स्थितीअभावी तो अंदमान समुद्रात रखडला होता. गेले काही दिवस केरळममध्ये जोरदार पाऊस होत असून, हा मान्सूनच्या आगमनाचा संकेत मानला जातो.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या दाबाच्या स्थितीमुळे मोसमी पावसाला गती मिळाली असून, कोणत्याही क्षणी तो अरबी समुद्राचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापत केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणाला ‘यलो अलर्ट’
दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. यावेळी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे.