Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती

नैर्ऋत्य मान्सूनने पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने शनिवारी केली. यामुळे यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती
Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली: नैर्ऋत्य मान्सूनने पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने शनिवारी केली. यामुळे यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत राजस्थानचे आणखी काही भाग आणि पंजाब, सौराष्ट्र व कच्छच्या काही भागांतून मान्सूनच्या पुढील परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही यात नमूद केले आहे.

१७ सप्टेंबर या सामान्य तारखेऐवजी १९ सप्टेंबर रोजी नैऋत्य मान्सूनने पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून माघार घेतली आहे,' असे हवामान विभागाने सांगितले.

४ जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर ९ जुलैपर्यंत नैर्ऋत्य मान्सूनने संपूर्ण देश व्यापला होता. ४ जून ते १९ सप्टेंबर दरम्यान देशभरात १५ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. सध्या सर्वाधिक फटका दक्षिण द्वीपकल्पीय भागाला बसला असून, तिथे ही तूट २९ टक्के आहे.

३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आपल्या मासिक अंदाजात हवामान खात्याने नमूद केले की, ऑगस्टमध्ये भारतात २१३.३ मिमी पाऊस झाला, जो २००१ नंतरचा ऑगस्ट महिन्यातील सातवा सर्वात कमी पाऊस होता.

यंदा जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. जुलैमध्ये सरासरी २८०.५ मिमी पाऊस होतो, तर या महिन्यात देशात २८३.३ मिमी पावसाची नोंद झाली. जूनमध्ये पावसाची एकंदरीत तूट ३५ टक्के होती. या महिन्यात सरासरी १६५ मिमी पाऊस होतो, परंतु प्रत्यक्षात केवळ १०६.८ मिमी पावसाची नोंद झाली.

या मान्सून हंगामात पाऊस कमी पडण्याचे एक मुख्य कारण म्हणजे जूनमध्ये विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात 'एल निनो' परिस्थिती निर्माण झाली होती. 'एल निनो' ही 'एल निनो सदर्न ऑसिलेशन' या हवामानविषयक घटनेच्या तीन टप्प्यांपैकी एक आहे. मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या तापमानातील बदल आणि त्यावरील वातावरणातील चढ-उतार हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

'एल निनो' मुळे जागतिक तापमान वाढते आणि भारतात कमी पाऊस पडतो, तर याच्या उलट टप्प्याला 'ला निना' म्हणतात, ज्यामुळे सामान्यतः तापमान कमी राहण्यास मदत होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in