

सुरत : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ मंगळवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) दोन बसेसची टक्कर झाली. या दुर्घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हा अपघात झाला. रस्त्यावर एक टँकर उलटला होता. टँकरला धडक होऊ नये म्हणून एका चालकाने प्रयत्न केले. पण, त्याचे बसवरील नियंत्रण सुटून तिने डिवायडर ओलांडून दुसऱ्या मार्गिकेवरील बसला टक्कर मारली. दोन्ही बस वेगात होत्या. यातील एक बस रस्त्याच्या उलटल्यानंतर तिला आग लागली. ज्यामुळे अनेक प्रवासी आतच अडकून पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन्ही बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या होत्या. अपघातानंतर एक बस उलटली आणि तिला आग लागली, अशी माहिती बारडोली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पी. एन. जाडेजा यांनी पत्रकारांना दिली.
जिल्हाधिकारी तेजस पटेल यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी ४.३० वाजता झाला. १७ जखमींवर बारडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ७ जणांना सुरत सिव्हील रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच सुरत आणि शेजारील तापी जिल्ह्यातील पोलीस पथके तात्काळ घटनास्थळी रवाना झाली.