
मुंबई : दाऊद टोळीकडून मुंबईतील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केली जात असून, खंडणीचा हा पैसा हवालामार्गे पाकिस्तानात पोहचवला जात असल्याची धक्कादायक माहिती आरिफ भाईजानच्या चौकशीतून पुढे आली आहे. आरिफ भाईजान हा टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. मुंबईतील एका व्यापाऱ्याकडून वसूल केलेली १७ कोटींची खंडणी हवालामार्गे छोटा शकीलपर्यंत पोहोचवल्याची तसेच या खंडणीचा भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांमध्ये वापर होत आहे, अशी कबुलीही त्याने दिली आहे.
हवाला संदर्भातील एक मॅसेज तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे. त्यात दाऊद टोळीचा हस्तक आरिफ शेखच्या सांगण्यावरून शब्बीर शेखने २९ एप्रिल २०२२ रोजी मालाडमधील हवाला ऑपरेटरकडून २५ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. शब्बीर शेख याने ओळख लपवण्यासाठी 'शाहीद' नावाचा वापर केला, मात्र त्याने नकळतपणे आपला खरा मोबाइल नंबर दिला. यात १० रुपयांच्या नोटेचा 'टोकन' म्हणून, तर २५ लाखांसाठी '२५ किलो' हा कोड वापर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार सूरतमधील एका हवाला ऑपरेटरला मुंबईला २५ लाख रुपये पाठवण्यास सांगितले होते. पैसे देण्यास सांगणारा रसीद भाई पाकिस्तानी नागरिक असून, तो दुबईत राहतो. त्यानेही पैसे छोटा शकीलचे असल्याचे सांगितले होते, असे तपासात पुढे आले आहे.
इमिग्रेशनच्या नोंदी नाहीत
सलीम फ्रूटच्या पत्नी शाझियाच्या चौकशीतही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाकिस्तान विमानतळ आणि तेथे काम करणाऱ्या व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधित आहेत. ते स्वतःच्या माणसांवर इमिग्रेशनचा स्टॅम्प लागू देत नाहीत. त्यामुळे अंडरवर्ल्डशी संबंधित कोण पाकिस्तानात येते आणि कोण पाकिस्तान सोडून जाते, याची नोंदही ठेवली जात नसल्याचे तिने तपासात सांगितले. छोटा शकीलची मुलगी झोयाच्या अँगेजमेंटसाठी दुबई ते पाकिस्तानच्या कनेक्टिंग फ्लाइटने कराचीला गेली होती. तेव्हा जिथे तिचा पासपोर्ट न तपासता आणि शिक्का न मारता प्रवेश देण्यात आला, अशी माहिती तिने एनआयएला आपल्या जबानीत दिली.