
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची टीका, नवी दिल्ली : राष्ट्रपतींना निर्धारित कालावधीत विधेयकांवर निर्णय घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जोरदार टीका केली. न्यायालय जर कायदे बनवू लागले तर संसद बंद केली पाहिजे. देशातील सुरू असलेल्या गृहयुद्धाला सुप्रीम कोर्ट व सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत, अशी टीका खासदार निशिकांत दुबे यांनी केली.
आपल्या ‘एक्स’वरून दुबे यांनी सुप्रीम कोर्टावर टीका केली. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्ट आपली सीमा ओलांडत आहे. प्रत्येक बाबीसाठी सुप्रीम कोर्टात जायचे असल्यास संसद व विधानसभा बंद केली पाहिजे, असे ते म्हणाले.
वक्फ (सुधारणा) कायद्याच्या संवैधानिकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. तसेच राष्ट्रपतींना विधेयकांवर वेळेत निर्णय देण्याच्या आदेशानंतर वक्फ सुधारणा विधेयकावर सुनावणी सुरू आहे. वक्फबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे विरोधी पक्षांनी कौतुक केले.
त्यावर दुबे म्हणाले की, तुम्ही नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांना निर्देश कसे देऊ शकता? राष्ट्रपती हे भारताच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. संसद देशाचे कायदे बनवते. तुम्ही त्या संसदेला आदेश कसे देऊ शकता? तुम्ही नवीन कायदा कसा बनवला? कोणत्या कायद्यात लिहिले आहे की, राष्ट्रपतींना तीन महिन्यांत निर्णय घ्यायचा आहे. याचा अर्थ तुम्ही देशाला अराजकतेच्या दिशेने नेऊ इच्छिता. जेव्हा संसदेत हा मुद्दा येईल तेव्हा विस्तृत चर्चा होईल, असे विविध प्रश्न दुबे यांनी उपस्थित केले.
दुबे यांचे वक्तव्य अपमानास्पद
काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर म्हणाले की, दुबे यांचे वक्तव्य अपमानास्पद आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टावर थेट हल्ला केला आहे. दुबे हे कायम देशाच्या संवैधानिक संस्थांना कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांनी सुप्रीम कोर्टाला लक्ष्य बनवले आहे. हे वक्तव्य संसदेच्या बाहेर केल्याने सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश या वक्तव्यावर लक्ष देतील, असे टागोर यांनी सांगितले.