

नवी दिल्ली/कोलकाता : निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असल्याचा तृणमूल काँग्रेस व द्रमुकने केलेले आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पूर्णपणे फेटाळून लावले. विरोधक जनतेची दिशाभूल करत असून भाजपचा ‘निःपक्षपाती, स्वतंत्र आणि न्याय्य लोकशाहीवर’ विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गडकरी म्हणाले, “हे सर्व आरोप चुकीचे आहेत. हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. भाजपचा लोकशाहीच्या मूल्यांवर पूर्ण विश्वास आहे.”
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी टीएमसी आणि तामिळनाडूमधील द्रमुक यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सखोल मतदारयादी तपासणी मोहिमेद्वारे उपेक्षित समाजातील मते काढून टाकली जात असल्याचा दावा या पक्षांनी केला आहे. या प्रकरणावरून कोलकाता येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर टीएमसी समर्थकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
भाजपच्या निवडणूक रणनीतीबद्दल बोलताना गडकरी म्हणाले की, पक्ष केवळ विकासकामांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन करेल. कोलकाता येथील निवडणूक कार्यालयाबाहेर एका भाजप कार्यकर्त्याकडे ४०० पेक्षा जास्त ‘फॉर्म ६’ (नाव नोंदणीसाठीचा अर्ज) सापडल्याचा दावा करण्यात आला, ज्यावरून टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ अंतर्गत जमावबंदी लागू केली आहे.
ते म्हणाले, ‘आम्ही केलेल्या सकारात्मक कामाच्या आधारावर आम्हाला निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची आहे. आम्ही देशाचे भविष्य बदलले आहे.’