

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. सुमारे ११८ खासदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून अध्यक्षांनी सभागृह चालवताना पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आज (दि. ११) सभागृहात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजप खासदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधातही कारवाईची मागणी करत ठराव मांडला आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणि परराष्ट्र धोरणाच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरल्यामुळे संसदेचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
इंडिया आघाडीतील सुमारे ११८ खासदारांनी ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. सभागृहाचे कामकाज चालवताना बिर्ला यांनी सत्ताधारी भाजपला जास्त संधी दिली आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. सुरुवातीला तृणमूल काँग्रेसने या प्रस्तावाबाबत नकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, नंतर तृणमूलच्या खासदारांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
अविश्वास ठरावावर अंतिम निर्णय होईपर्यंत अध्यक्षपदाच्या खुर्चीवर न बसण्याचा निर्णय ओम बिर्ला यांनी घेतला आहे. लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. त्यामुळे मंगळवारी लोकसभेचे कामकाज सुरू करताना तालिका अध्यक्ष एन. के. प्रेमचंद्रन आणि जगदंबिका पाल हे अध्यक्षांच्या आसनावर बसले होते.
मंगळवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच, विरोधकांनी गोंधळ घातला आणि पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धावर, त्याचा भारतावर होणारा परिणाम आणि देशाच्या ऊर्जा क्षेत्राच्या स्थितीवर चर्चा करण्याची मागणी केली. विरोधकांनी ‘आपल्याला देश वाचवायचा आहे, आपल्याला मोदींना हटवायचे आहे,’ ‘मोदी सरकारला लाज वाटली पाहिजे,’ आणि मतचोरांनो, सिंहासन सोडा’ अशी घोषणाबाजी केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्धही अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधी पक्ष करत आहे. याचा मसुदा तयार करण्यात आला आहे आणि पुढील आठवड्यात हा प्रस्ताव मांडला जाईल.