एफआयआरशिवाय अंत्यसंस्कार नाही, मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांची ठाम भूमिका; मदत नाकारली

शेतकरी आंदोलनात डोक्याला अश्रुधुराचे नळकांडे लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेली मदत नाकारली आहे.
एफआयआरशिवाय अंत्यसंस्कार नाही, मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांची ठाम भूमिका; मदत नाकारली
(संग्रहित छायाचित्र, पीटीआय)

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात डोक्याला अश्रुधुराचे नळकांडे लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी देऊ केलेली मदत नाकारली आहे. मृत्यूला जबाबदार असलेल्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केल्याशिवाय मृत शेतकऱ्याचा अंत्यविधी केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

शेतीमालाला हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढला आहे. या आंदोलनादरम्यान शुक्रवारी खानौरी सीमेवर शुभकरण सिंग या २१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्याच्या नातेवाईकांना १ कोटीची मदत व त्याच्या बहिणीला नोकरी देऊ केली. मात्र, नातेवाईकांनी ही मदतही नाकारली आहे. मृत्यूस जबाबदार व्यक्तींवर एफआयआर दाखल केल्याशिवाय शुभकरणचे अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.

पीक कर्जावरील व्याज आणि दंड माफ

चंदिगड : शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शुक्रवारी काही पीक कर्जावरील व्याज आणि दंड माफ करण्याची घोषणा केली. त्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १.८९ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केल्याने करामध्ये वाढ केली नाही.

पंजाब-हरयाणा सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलने तीव्र केली असताना अर्थसंकल्पीय प्रस्तावांची घोषणा करताना, खट्टर यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली आहेत आणि १४ पिकांसाठी एमएसपी दिली जात आहे. कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई दुप्पट करून एक कोटी रुपये करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in