कोणत्याही राज्यावर भाषा लादली जाणार नाही! ‘त्रिभाषा सूत्र’ वादावर केंद्राने केली भूमिका स्पष्ट

त्रिभाषा सूत्रानुसार कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने बुधवारी मांडली.
कोणत्याही राज्यावर भाषा लादली जाणार नाही! ‘त्रिभाषा सूत्र’ वादावर केंद्राने केली भूमिका स्पष्ट
Published on

नवी दिल्ली : त्रिभाषा सूत्रानुसार कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने बुधवारी मांडली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यसभेत याबद्दलची माहिती देत गोंधळ दूर केला. गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्रावरून राज्य विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष होताना दिसत आहे. त्यावर केंद्र सरकारने संसदेत अधिकृत भूमिका मांडली.

केंद्र सरकारच्या नव्या त्रिभाषा सूत्रावरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष सुरू झाला. तामिळनाडू सरकारने याला कडाडून विरोध केला. केंद्र सरकारवर तामिळनाडू सरकारने गंभीर आरोपही केले होते.

विद्यार्थी आणि राज्याच्या आवडीनुसार भाषा शिक्षण

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राज्यसभेत माहिती देण्यात आली की, त्रिभाषा सूत्रानुसार कोणतीही भाषा कोणत्याही राज्यावर लादली जाणार नाही. राज्य सरकार आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार भाषांची निवड केली जाईल आणि त्यामध्ये लवचिकता असेल आणि स्वायतत्तेला प्रोत्साहन दिले जाईल.

निधी थांबविला

याच सूत्रावरून गेल्या काही महिन्यांपासून तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. हा फॉर्म्युला लागू करावा, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यास तामिळनाडूने नकार दिल्याने ‘समग्र शिक्षण अभियाना’चे ५७३ कोटी रुपये निधी केंद्राने थांबवला. केंद्राचे म्हणणे आहे की, हा निधी मिळवण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जावे, पण, तामिळनाडूने याविरोधात भूमिका घेतली आहे.

काय आहे त्रिभाषा सूत्र?

जुलै २०२० मध्ये केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले होते. त्यामध्ये त्रिभाषा सूत्राचा उल्लेख करण्यात आला होता. यात असे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीय असायला हव्यात. ज्यामध्ये इंग्रजी भाषेला गृहित धरले जाणार नाही. विद्यार्थांनी तीन भाषा शिकल्या पाहिजे. हा फॉर्म्युला सरकारी आणि खासगी शाळांनाही लागू असेल.

logo
marathi.freepressjournal.in