

ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) : गौतम बुद्ध नगरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी मंगळवारी सांगितले की, अलीकडील कामगार आंदोलनांच्या संदर्भात ३५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. अनेक व्यक्ती अफवा आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा ‘गैरवापर’ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना एसीपी राजीव नारायण मिश्रा म्हणाले की, काही लोक व्हॉट्सॲप बॉट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह नवीन तयार केलेल्या डिजिटल नेटवर्कद्वारे सक्रियपणे खोटी माहिती पसरवत होते आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते म्हणाले, ‘आम्ही ३५० हून अधिक लोकांना अटक केली आहे. काही जण सोशल मीडियाचा गैरवापर करून अफवा पसरवत होते आणि खोटी माहिती देत होते. काही जण नवीन तयार केलेल्या व्हॉट्सॲप बॉट्स आणि ट्विटर द्वारे दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते. याची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज अनेक कंपन्यांमध्ये कामगार कामावर परतत आहेत
पगारवाढीच्या मागणीसाठी नोएडातील कारखान्यांमधील कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले होते. नोएडातील ‘फेज-२’ आणि ‘सेक्टर ६०’ परिसरात आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ केली, मालमत्तेची तोडफोड केली आणि जोरदार दगडफेक केली. या हिंसाचारामुळे दिल्ली-नोएडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून हजारो प्रवासी रस्त्यावर अडकून पडले.
‘सेक्टर ६०’, ‘सेक्टर ६२’ आणि ‘सेक्टर ८४’ मधील औद्योगिक वसाहतींमध्ये तोडफोड करण्यात आली आणि ‘मदरसन’ कंपनीच्या युनिटबाहेरही निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी ‘नॅशनल हायवे ९’ रोखून धरल्यामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्यामागणी काय
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वेतन सुधारणेच्या मागणीसाठी विविध औद्योगिक युनिटमधील कामगार सकाळी एकत्र जमले होते. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाचे रूपांतर नंतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. उत्तर प्रदेश सरकारने कामगारांच्या कल्याणासाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हिंसाचार झाला. जिल्हा दंडाधिकारी मेधा रूपम यांनी रविवारीच उद्योजकांशी चर्चा केली होती.
राहुल यांचा पाठिंबा
प्रदर्शन करणाऱ्या कामगारांची बाजू घेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी किमान वेतनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला मजुरांच्या व्यापक आर्थिक संकटाचे प्रतिबिंब म्हटले आहे.एक्स (X) वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:’काल नोएडाच्या रस्त्यावर जे काही घडले ते या देशातील कामगारांचा शेवटचा आक्रोश होता- असा आवाज ज्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि जो विनंत्या करून थकला आहे. नोएडातील एका कामगाराचा मासिक पगार १२,००० रुपये आहे; घराचे भाडे ४,००० ते ७,००० रुपये आहे. त्याला ३०० रुपयांची वार्षिक पगारवाढ मिळेपर्यंत, घरमालक वर्षाला ५०० रुपयांनी भाडे वाढवतो.’
सर्वांना समान वेतन शक्य नाही- भामसं
दिल्ली: नॉयडामध्ये कामगारांच्या हिंसक आंदोलनानंतर भारतीय मजदूर संघाने मंगळवारी उद्योगांना तातडीने सुधारात्मक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. मात्र, ‘समान राष्ट्रीय वेतन संरचना’ ही संकल्पना ‘व्यवहार्य आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या या कामगार संघटनेने म्हटले आहे की, सध्याची अस्वस्थता कामगारांच्या खऱ्या समस्या दर्शवते. त्यामुळे उद्योगांनी वाजवी वेतन पद्धती सुनिश्चित करणे, कंत्राटी कामगारांवरील अवलंबित्व कमी करणे यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.