इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पेारेशन लि. (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पेारेशन लि. (एचपीसीएल) या तेल कंपन्यांना जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत १०,७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलची विक्री कमी किंमतीत करत असल्याने या कंपन्यांचा तोटा वाढला असल्याचे सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
कच्चे साहित्य म्हणजे कच्च्या तेला्या दरात एप्रिल ते जून या कालावधीत मोठी वाढ झाली असतानाही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा आढावा घेण्यात आला नाही. त्यामुळे या तेल कंपन्यांच्या तोट्यात वाढ होत गेली,असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका अहवालात म्हटले आहे.
तीन सरकारी तेल कंपन्या - आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांचा देशातील किरकोळ इंधन विक्रीतील हिस्सा तब्बल ९० टक्के आहे. या कंपन्यांचे स्वत:चे तेलशुद्धीकरण कारखाने असून ते कच्च्या तेलाचे शुद्धीकरण करुन पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन करतात. कच्च्या तेलाचे पेट्रोल, डिझेलमध्ये रुपांतर केल्यानंतर विक्री करताना मोठा नफा या कंपन्या कमावतात. परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीही बदल होत नसल्याने या तेल कंपन्यांच्या नुकसानात वाढ होत आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यासंदर्भातील अहवालात म्हटले आहे की, या तेल कंपन्यांना तिमाहीत पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटरमागे १२ ते १४ रुपये नुकसान होत आहे. तेलशुद्धीकरणातील सरासरी नफा (ग्रॉस रिफायनिंग मार्जिन्स - जीआरएम) प्रति बॅरल १७ ते १८ अमेरिकन डॉलर्स होतो आणि विपणन उलाढाल वृद्धी १७ ते २० टक्के आहे, असे ब्रोकरेजने म्हटले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीतून आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत या तेल कंपन्यांचे नुकसान निव्वळ नफा १०,७०० कोटी रुपयांपर्यंत होईल. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड तेलाच्या दरात घसरण होत असल्याने या तेल कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण तेल कंपन्यांचे नुकसान काही प्रमाणात कमी होईल. तथापि, रिलायन्स इंडस्ट्रीज लि.साठी ही तिमाही उत्तम राहील, असेही या अहवालात म्हटले आहे.