
विशाखापट्टणम : एकीकडे देशाची लोकसंख्या १४० कोटींपार गेली असतानाच, लोकसंख्या नियंत्रणाकडे सरकारचे लक्ष आहे. मात्र, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे लोकसंख्यावाढीला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट होत आहे. एखाद्या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त मुले असतील तरच तो सरपंच, नगरसेवक किंवा महापौर होऊ शकतो, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे. अधिक मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहित करण्यासाठी राज्यात धोरण राबवले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
“आंध्र प्रदेश राज्यात विकास दर वाढला पाहिजे. प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे आणि कुटुंबांनी किमान दोन किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. केंद्राच्या ‘युथ इन इंडिया-२०२२’ अहवालानुसार, आपल्या देशातील २५ कोटी तरुण हे १५ ते २५ वयोगटातील आहेत. पुढील १५ वर्षांत तो वेग आणखी घसरेल,” अशीही भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चंद्राबाबू म्हणाले की, “एकेकाळी जास्त मुले असलेल्या व्यक्तींना पंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक लढवण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता कमी मुले असलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकणार नाही, असे माझे म्हणणे आहे.
हल्ली एका अपत्याला जन्म देण्यासही टाळाटाळ
तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुले असतील तरच तुम्ही सरपंच, नगरपालिका नगरसेवक, महानगरपालिका अध्यक्ष किंवा महापौर होऊ शकता. जुन्या पिढीला जास्त मुले होती, तर सध्याच्या पिढीने ती एका अपत्यापुरती मर्यादित ठेवली आहे. तसेच काही ‘हुशार’ लोक आजकाल त्यांच्या उपजीविकेचा आनंद घेण्यासाठी एकाही अपत्याला जन्म देण्यास तयार नाहीत. त्यांच्या पालकांनी त्यांच्यासारखा विचार केला असता तर ते या जगात आले नसते.”