
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्याने मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे एअर स्ट्राईकद्वारे उद्ध्वस्त करण्यात आली. 'ऑपरेशन सिंदूर' असे या मिशनला नाव देण्यात आले होते. मंगळवारची मध्यरात्र उलटून गेल्यावर रात्री सुमारे १.५० च्या सुमारास भारतीय सैन्यानं ही धाडसी कारवाई केली आणि एकाचवेळी एअर स्ट्राईक करीत पाकिस्तानमधील ४ आणि पीओकेमधील ५ ठिकाणांना उडवले. पाकिस्तानमधील ७ शहरांमधील एकूण ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
ज्या ठिकाणांहून भारतावर हल्ला करण्याची योजना दहशतवादी आखायचे, भारताविरोधात कट रचायचे आणि जेथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते त्या ९ ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते, असे समजते. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. या हल्ल्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
या हल्ल्यात पाकिस्तानी सैनाच्या कुठल्याही ठिकाणांवर हल्ला केला गेला नाही, कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नाही. फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य करण्यात आल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानी सैन्यानेही प्रतिक्रिया देताना ६ ठिकाणी २४ हल्ले झाल्याची कबुली दिली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर काही वेळातच पाकिस्तानी लष्कराकडून राजौरी आणि पूंछ जिल्ह्याच्या सीमांवर गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे, असे भारतीय लष्कराने सोशल मीडियावर सांगितले. दरम्यान, भारताने केलेल्या हल्ल्याला कडक प्रत्युत्तर देण्याची वल्गना देखील पाकिस्तानने केली आहे.