
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ही केवळ सैन्य मोहीम नव्हती तर बदलत्या भारताचे चित्र होते. जे जागतिक स्तरावर भारताचा संकल्प, साहस व वाढती ताकद दाखवते, असे प्रतिपादन ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
‘मन की बात’ या दरमहा रेडियोच्या कार्यक्रमातून राष्ट्राला संबोधित करताना मोदी म्हणाले की, संपूर्ण देश आज दहशतवादाविरोधात एकत्र झाला आहे. त्याच्या मनात राग आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवादाविरोधात जागतिक लढाईत एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यातून भारताची वाढती क्षमता व उद्देश दिसून येतो. त्यामुळे नवीन आत्मविश्वास व ऊर्जा मिळाला आहे. सीमापलीकडे दहशतवादी तळावर भारतीय सैन्याने केलेल्या अचूक हल्ले हे भारताच्या क्षमतेचे प्रतिक आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, भारतातील अनेक शहरात तरुणांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वेच्छेने काम केले. अनेकांनी कविता लिहिल्या, संकल्प गीत म्हटले तसेच चित्र काढली. कटिहार व कुशीनगर शहरात अनेक कुटुंबानी आपल्या नवजात बालकांचे नाव ‘सिंदूर’ ठेवले. या मोहिमेचे यश भारताच्या संरक्षण क्षमतेचे आहे. सैनिकांचे शौर्य, भारतात बनलेली शस्त्रास्त्रे, उपकरण व तंत्रज्ञानाची मदत मिळाली, असे मोदी म्हणाले.