

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या भारतीय सशस्त्र दलातील ६ जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे सार्वजनिक करण्यात आली आहेत. आजवर या लष्करी मोहिमेत भारतीय जवान मारले गेले याबाबत सरकारी पातळीवर जाहीर बोलणे टाळले जात होते.
ही नावे नॅशनल वॉर मेमोरियलच्या वेबसाइटवरील 'रोल ऑफ ऑनर'मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ३ डी भिंतीवर २०२५च्या विभागातही त्यांची नावे कोरण्यात आली आहेत.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६-७ मे २०२५ च्या दरम्यान 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले होते. दहा मे रोजी ही कारवाई थांबवण्यात आली होती.
राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन २०१९मध्ये इंडिया गेटजवळ झाले होते. येथे स्वातंत्र्यानंतर देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांची नावे नोंदवली जातात. या सहा नावांच्या समावेशामुळे ऑपरेशन सिंदूरही त्या लष्करी मोहिमांमध्ये समाविष्ट झाले आहे, ज्यांना राष्ट्रीय युद्ध स्मारकावर अधिकृतपणे सन्मानित करण्यात आले आहे.
वीर जवानांची नावे
या सहा शहिदांमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान आणि भारतीय हवाई दलाच्या एका सार्जंटचा समावेश आहे. सुभेदार मेजर पवन कुमार - १० इन्फंट्री ब्रिगेड मुख्यालय, रायफलमन सुनील कुमार - ४ थी बटालियन, जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री (मरणोत्तर 'वीर चक्र'), लान्स नाईक दिनेश कुमार - ५ वी फील्ड रेजिमेंट ४, अग्निवीर मुरली नाईक - ८५१ वी लाइट रेजिमेंट, हवालदार सुनील कुमार सिंग - २३७ वी फील्ड वर्कशॉप आणि. सार्जंट सुरेंद्र कुमार - ३९ विंग, भारतीय हवाई दल (मरणोत्तर 'वायुसेना मेडल') अशी या वीर जवानांची नावे आहेत.