वॉशिंग्टन : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चार दिवसांच्या युद्धात (ऑपरेशन सिंदूर) पाकिस्तानला मोठे लष्करी यश मिळाल्याचा दावा अमेरिकन अहवालात करण्यात आला आहे. त्यावरून काँग्रसने सरकारवर जोरदार टीका केली आहे. अहवालात करण्यात आलेल्या दाव्यावर पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालय आक्षेप नोंदविणार का, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला असून हा आपल्या राजनैतिकतेला मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे.
या अहवालात पहलगाम हल्ल्याला दहशतवादी हल्ला नसून ‘बंडखोरीचा हल्ला’ असे संबोधले आहे. हा ८०० पानांचा अहवाल ‘अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा पुनरावलोकन आयोगा’ने (यूएससीसी) प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या अहवालाला विरोध दर्शवला आहे आणि त्याबद्दल वरील प्रश्न उपस्थित केले आहेत.
या लढाईनंतर, जगभरातील चिनी दूतावासांनी त्यांच्या शस्त्रांचे कौतुक केले आणि म्हटले की, पाकिस्तानने त्यांचा वापर भारतीय लढाऊ विमाने पाडण्यासाठी केला होता. भारत-पाकिस्तान संघर्षानंतर पाच महिन्यांनी, चीनने इंडोनेशियाला ७५ हजार कोटी रुपयांना ४२ जे-१०सी लढाऊ विमाने विकण्याचा करार केला होता.
तीन भारतीय विमाने पाडली
अहवालात असे म्हटले आहे की, पाकिस्तानने राफेल विमानांसह किमान सहा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे राफेलची प्रतिमा खराब झाली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, प्रत्यक्षात फक्त तीन भारतीय विमाने पाडण्यात आली आहेत. ‘यूएससीसी’चे म्हणणे आहे की, चीनने भारत-पाकिस्तान युद्धाचा वापर थेट युद्धात आपल्या आधुनिक शस्त्रांची चाचणी घेण्यासाठी आणि ती जगासमोर प्रदर्शित करण्यासाठी केला.