
नवी दिल्ली : रा. स्व. संघाशी संबंधित एका साप्ताहिकाने व्यापक राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरण आखणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. देशाच्या काही भागातील लोकसंख्याशास्त्रीय असमतोलाकडे लक्ष वेधण्यात आले असून मुस्लिम लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे म्हटले आहे.
‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाच्या संपादकीयमध्ये लोकसंख्येबाबतच्या प्रादेशिक असमतोलाचाही उल्लेख केला आहे. पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण उपाययोजनांच्या अंमलबजावणीत तुलनात्मकदृष्ट्या बरी कामगिरी केली आहे, असेही म्हटले आहे.
राष्ट्रीय स्तरावर लोकसंख्या स्थिर असली तरी सर्व धर्म आणि प्रदेश यामध्ये सारखी स्थिती नाही. काही भागांमध्ये विशेषत: सीमेवरील जिल्ह्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, असे संपादकीयमध्ये म्हटले आहे.
पश्चिम बंगाल, आसाम आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरामुळे लोकसंख्येत अनैसर्गिक वाढ झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हिंदूंचा अपमान करणे परवडते, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुस्लिम कार्ड स्वीकारू शकतात, तर द्रविडी पक्ष सनातन धर्माबद्दल अपशब्द उच्चारू शकतात, कारण त्यांच्यात कथित अल्पसंख्य व्होट बँक एकत्रित करण्याचा विश्वास असतो, असेही ‘ऑर्गनायझर’मध्ये म्हटले आहे.