
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजयी घोडदौड रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी मोठ बांधायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर बंगळुर येथे विरोधकांची बैठक होत आहे. या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडी नावावर चर्चा झाली असून यात INDIA या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव मांडला याला असून राहुल यांच्या कल्पकतेच सर्वांनी प्रचंड कौतूक केलं. या बैठकीत सर्वांनी याच नावाखाली लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
विरोधकांच्या आघाडीच्या INDIA या नावाचा अर्थ काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
* I - Indian
* N - National
* D - Democratic
* I - Inclusive
* A - Alliance
Indian National Democratic Inclusive Alliance असं या आघाडीचं नामकरण करण्यात आलं आहे. 'भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी' असं देखील या आघाडीला म्हटलं जाऊ शकतं.
या बैठकीनिमीत्त बंगळूरू येथे जमलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांती केंद्र सरकारवर टीका केली. तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही एक चांगली आणि अर्थपूर्ण बैठक आहे. आज झालेल्या चर्चेनंतर निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो. असं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बैठकीत बोलताना सर्वजण मिळून भाजपचा पराभव करु, असा विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधान पदात रस नसून आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचं रक्षण करण्याचा आमचा हेतू असल्याचं सांगितलं. तसंच राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र, हे मतभेद विचारधारेशी संबंधित नसल्याचं खर्गे यांनी या बैठकीवेळी स्पष्ट केलं.