
जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव सोमवारी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी म्हणाले की, यजमान असल्याने पर्यटकांना सुरक्षित परत पाठवणे आपले कर्तव्य होते, मात्र आपण ते पार पाडू शकलो नाही, पीडितांच्या कुटुंबीयांची आणि देशवासीयांची माफी मागण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विधानसभेत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, त्यांच्याकडे वेदना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. या दुर्घटनेने केवळ पीडितांच्या कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण देशालाही धक्का बसला आहे. याचबरोबर त्यांनी, २२ एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांची माफी मागण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीत. या घटनेचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे. आपण असे अनेक हल्ले यापूर्वी पाहिले आहेत. पहलगामच्या बैसरणमध्ये इतका मोठा हल्ला झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांची माफी कशी मागावी हे मला समजत नाही.
ही दहशतवादाच्या अंताची सुरुवात
अब्दुल्ला पुढे म्हणाले की, काश्मीरच्या मशिदींमध्येही दहशतवादाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ही काश्मीरमधील दहशतवादाच्या अंताची सुरुवात आहे. आपण असे काहीही बोलू नये किंवा दाखवू नये ज्यामुळे या चळवळीला हानी पोहोचेल. जेव्हा लोक आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल आणि आता असे दिसते की लोक त्या टप्प्यावर पोहोचत आहेत.