

इस्लामाबाद : सीमा कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही आणि उद्या सिंध भारताला पुन्हा परत मिळू शकतो, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते, त्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने निषेध केला आहे. पाकिस्तानने सिंह यांचे विधान हे भ्रामक आणि धोकादायक पद्धतीने बदल करण्याच्या बाजूचे असल्याचे म्हटले आहे. अशी विधाने ही प्रस्थापित झालेल्या वास्तविकतेला आव्हान देऊ पाहणारी हिंदुत्वाची मानसिकता उघड करतात आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे, मान्यता मिळालेल्या सीमा आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे स्पष्टपणे उल्लंघन करणारी आहेत, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
आज सिंध भारताचा भाग नसला तरी, भविष्यात सीमा बदलू शकतात आणि हा भाग एके दिवशी भारताकडे परत येऊ शकतो. सिंधी समुदायाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संरक्षणमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पुस्तकातील उल्लेख केला आणि सांगितले की, अडवाणी यांच्या पिढीतील अनेक सिंधी हिंदूंना सिंध भारतापासून वेगळा झाला हे आजही स्वीकारणे कठीण जाते. पाकिस्तानची निर्मिती १९४७ च्या फाळणीदरम्यान झाली आणि सिंधू नदीच्या बाजूचा सिंध प्रदेश तेव्हापासून पाकिस्तानचा भाग आहे.