
“पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येईल, तो दिवस फार दूर नाही”, असा आशावाद संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. यावरून दोन्ही देशांमध्ये नेहमीच आक्रमक भूमिका घेण्यात येते.
१९४७ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने यशस्वीरीत्या प्रवेश केल्याच्या निमित्ताने दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘शौर्य दिवस’ निमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक करतानाच पाकव्याप्त काश्मीर आणि इतर मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.“भारतीयच लष्कर हे जगात सर्वोत्तम आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीर पुन्हा अखंड करण्याची एक मोहीम आपण सुरू केली आहे. जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान पुन्हा भारताचा भाग होत नाहीत, तोपर्यंत ही मोहीम पूर्ण होणार नाही,’’ असे राजनाथ सिंह म्हणाले.
दरम्यान, हे भाग भारतात समाविष्ट होण्याचा दिवस फार दूर नाही, असा आशावादही राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. “पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे दु:ख आम्ही समजू शकतो. पाकिस्ताकडून त्यांच्या हक्कांचे उल्लंघन केले जात आहे,’’ असा आरोप राजनाथ सिंह यांनी यावेळी केला.