पाकिस्तानी जनता भारतीयांसाठी बहुमूल्य ठेवा : मणिशंकर अय्यर

पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त शाहीद मलिक यांनी नमूद केले की, मणिशंकर अय्यर यांचा जन्म लाहोरमधील लक्ष्मी हवेलीमध्ये झाला होता.
पाकिस्तानी जनता भारतीयांसाठी बहुमूल्य ठेवा : मणिशंकर अय्यर

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील जनता ही भारतीयांचा बहुमूल्य ठेवा आहे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांनी हे विधान केले आहे. पाकिस्तानी लोक जशास तसे आहेत, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. तुम्ही त्यांच्याशी मैत्रीपूर्ण भाव ठेवला तर ते तुमचे मित्र होतात. तुम्ही त्यांच्याशी शत्रुत्व ठेवलं तर ते तुमचे शत्रू बनतील, असे अय्यर यांनी म्हटले आहे.

अय्यर म्हणाले, “पाकिस्तानमधील जनतेने ज्याप्रमाणे स्वागत केलं, तसं स्वागत इतर कोणत्याही देशात झाले नाही. मी पाकिस्तानच्या लोकांना एवढंच सांगतो की, मोदींना कधीही एक तृतीयांशपेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. पण, आमची व्यवस्था अशी आहे की, एक तृतीयांश मते असतील तर त्यांच्याकडे दोन तृतीयांश जागा आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश भारतीय तुमच्याकडे येण्यास तयार आहेत.”

सहा वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत-पाकिस्तान संबंधाबाबत भारतीय राजदूत सतींदर कुमार लांबा यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचा उल्लेख करत मणिशंकर अय्यर म्हणाले, “इस्लामाबादमध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि भाजप सरकारमधील पाच भारतीय उच्चायुक्त झाले. त्या पाचही उच्चायुक्तांनी पाकिस्तानबरोबर संवाद सुरू ठेवण्याबाबत एकमताने सहमती दर्शवली होती. परंतु, गेल्या १० वर्षांत दोन्ही देशांत संवाद न होणे ही सर्वात मोठी चूक आहे. तुमच्यावर सर्जिकल स्ट्राइक करण्याचे धाडस आमच्यात आहे, पण एकत्र बसून बोलण्याचे धाडस आमच्यात नाही”, असंही अय्यर म्हणाले.

काश्मीरवर चर्चा शक्य

पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त शाहीद मलिक यांनी नमूद केले की, मणिशंकर अय्यर यांचा जन्म लाहोरमधील लक्ष्मी हवेलीमध्ये झाला होता. शांततेसाठी पुढाकार पाकिस्तानकडून आलाच पाहिजे या अय्यर यांच्या विधानावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, अलीकडेच पाकिस्तानने भारताला संवाद प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली होती. परंतु, भारत सरकार तसे करण्यास टाळाटाळ करत आहे. २००८ साली ज्या ठिकाणी संवाद थांबला होता, तिथूनच पुन्हा संवाद सुरू करायला पाकिस्तानला आनंद होईल. या संवादातून काश्मीर आणि दहशवादासारख्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in