मुंबई : आपल्या चवीने १९९० च्या दशकात लहान मुलांना वेड लावणाऱ्या ‘रावळगाव’ने आपला कँडी व्यवसाय रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला विकला आहे. कंपनीने रावलगावचा ट्रेडमार्क्स, रेसिपीज व स्वामित्व हक्क ताब्यात घेतले आहेत; मात्र, प्रॉपर्टी, जमीन, प्लांट, बिल्डिंग, सामुग्री व मशिनरी रावळगावकडेच राहतील. हा व्यवहार २७ कोटी रुपयांना झाला.
रावळगाव कंपनीने सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून साखरेशी संबंधित कन्फेक्शनरी व्यवसाय चालवणे कठीण बनले होते. या क्षेत्रात संघटित व असंघटित क्षेत्रात स्पर्धा वाढू लागली. त्यामुळे आमचा बाजारातील हिस्सा कमी झाला. कच्चा माल, कामगारांवरील वाढता खर्च, विजेची वाढती बिले त्यामुळे नफा कमी झाला. कंपनीने देशात पहिल्यांदाच पानाचा स्वाद असलेली पानपसंद, मँगो मूड, कॉफी ब्रेक, टूटी-फ्रूटी, सुप्रीम टॉफी, कोको क्रीम आदी उत्पादने आणली.‘रावळगाव शुगर कंपनी’ची स्थापना उद्योजक वालचंद हिरानंद यांनी १९३३मध्ये नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथे केली होती. १९४२ मध्ये या कंपनीने रावळगाव नावाचे चॉकलेट बनवण्यास सुरुवात केली. अल्पावधीमध्ये हे चॉकलेट बच्चे कंपनीच्या पसंतीत उतरले. त्यानंतर पान पसंद या चॉकलेटनेही लहानांपासून थोरांना वेड लावले. आताही या कंपनीकडे मँगो मूड, कॉफी ब्रेक, टूटी फ्रुटी, पान पसंद, चोको क्रीम आणि सुप्रीम यासारखे हे ब्रँड आहेत.