

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्या दिवशी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन टप्प्यांत अधिवेशन
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणि अर्थसंकल्पावर चर्चा झाल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर सुमारे एक महिन्याच्या सुट्टीनंतर ९ मार्च रोजी पुन्हा कामकाज सुरू होईल आणि २ एप्रिल (गुरुवार) रोजी अधिवेशन संस्थगित होणार आहे.
३ एप्रिल रोजी 'गुड फ्रायडे' असल्याने अधिवेशन एक दिवस आधीच आटोपणार आहे.
२०१६ पर्यंत अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला सादर केला जायचा. मात्र, २०१७ मध्ये मोदी सरकारने ही परंपरा बदलून १ फेब्रुवारी केली. नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होण्यापूर्वी सर्व तांत्रिक आणि विधायी प्रक्रिया पूर्ण होऊन निधीची तरतूद वेळेत व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र अर्थसंकल्पाची तारीख अद्याप ठरलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
ऐतिहासिक 'नऊ'चा आकडा
या अर्थसंकल्पासह निर्मला सीतारामन सलग नऊ वेळा बजेट सादर करण्याचा विक्रम आपल्या नावे करतील. भारताच्या इतिहासात सर्वाधिक १० वेळा बजेट मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. सीतारामन आता या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचल्या आहेत. एकाच पंतप्रधानांच्या कार्यकाळात सलग ९ वेळा बजेट मांडणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील.
मध्यमवर्गीयांना दिलासा?
वाढती महागाई आणि कररचनेत बदलाची मागणी पाहता, यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना आयकरामध्ये मोठी सवलत मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आर्थिक विकासाचा वेग कायम राखण्यासाठी सरकार कोणत्या नव्या घोषणा करते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.