
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून पहिल्याच दिवशी संसद भवनात दोन्ही सभागृहांतील सदस्य राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतील. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात सर्व विरोधकांचे निवडलेले उमेदवार यशवंत सिन्हा यांचे आव्हान असणार आहे. वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, तसेच महाराष्ट्रातील शिंदे गटातील आमदारांनी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर झारखंड मुक्ती मोर्चा आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर खासदारांनी दबाव आणल्यामुळे शिवसेनेनेही मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. भाजपसहित अन्य पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून, विद्यमान संसद भवनातील हे अखेरचे अधिवेशन असेल.
आता संसदेच्या नव्या इमारतीमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याचे केंद्रीय नागरी विकासमंत्री हरदीप पुरी यांनी जाहीर केले आहे. असंसदीय शब्दांवरून वातावरण तापल्यानंतर संसदेच्या आवारात निदर्शने, धरणे धरण्यास मनाई करणाऱ्या परिपत्रकावरूनही वादंग माजला असून, त्याविरोधातही विरोधक अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आक्रमक होण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत असेल. एकूण १८ सत्रांमध्ये लोकसभेत मंजुरीसाठी २९ विधेयके मांडली जाणार असून, त्यात २४ नवीन विधेयके असतील.