

तिरुवनंतपुरम : केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीच्या मोठ्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि सीपीआय(एम) पॉलिट ब्युरो सदस्य पिनराई विजयन यांनी आपले मौन सोडले. आपण जनमत स्वीकारले असून विजयाबद्दल काँग्रेसप्रणित आघाडीचे अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत भाजपला तीन जागा मिळाल्याबद्दल विजयन यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, "भाजपने तीन जागा जिंकणे ही गंभीर बाब असून धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करू इच्छिणाऱ्यांसाठी हे चिंताजनक आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या जातीयवादाशी तडजोड न करता फूट पाडणाऱ्या राजकारणाविरुद्ध आमचा लढा सुरूच ठेवू."
पक्षाच्या राज्य समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात विजयन म्हणाले की, जनतेचा कौल हा शेवट नसून लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आणि पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन परतण्यासाठीची ही एक सुरुवात आहे.
ते पुढे म्हणाले की, सलग तिसऱ्या विजयाची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नसली तरी, जनतेच्या एका मोठ्या वर्गाने एलडीएफला पाठिंबा दिला आहे, ही बाब आत्मविश्वास वाढवणारी आहे.
विजयन यांनी माहिती दिली की, एलडीएफ आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे, तसेच जनतेने उपस्थित केलेल्या चिंता, मते आणि टीका ऐकून घेऊन निवडणूक निकालांचे खुले आणि लोकशाही मार्गाने परीक्षण करेल. त्यानंतरच पुढच्या वाटचालीचा निर्णय घेतला जाईल.