

सिलिगुडी : ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागापासून तोडण्याची धमकी देणाऱ्या ‘तुकडे-तुकडे गँग’ला तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिला आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.
उत्तर बंगालमधील सिलिगुडी येथील कावाखाली मैदानावर आयोजित निवडणूक सभेत ते बोलत होते. तृणमूल काँग्रेस आपल्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे या गँगला रस्त्यापासून संसदेपर्यंत साथ देत असून, हाच या पक्षाचा खरा चेहरा असल्याची टीका मोदी यांनी केली.
ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉरचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. पश्चिम बंगालमध्ये ‘डबल इंजिन’ सरकार निवडून देण्याचे आवाहन करतानाच, भाजपचे सरकार आल्यास बंगालचा विकास दुप्पट वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तृणमूल काँग्रेसने आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात राज्याचा विनाश केला असून, केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे आणल्याने केवळ २५ टक्क्यांहून कमी काम पूर्ण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
मदरशांसाठी ६ हजार कोटी दिले
मदरशांच्या विकासासाठी तृणमूल सरकारने ६,००० कोटी रुपयांची तरतूद केली, मात्र संपूर्ण उत्तर बंगालसाठी अपुरा निधी दिल्याची टीका मोदी यांनी केली. तृणमूल काँग्रेस हा आदिवासी, महिला आणि युवक विरोधी पक्ष असल्याचे सांगतानाच, लोकांचा उत्साह पाहून आगामी निवडणुकीत या पक्षाचा पराभव निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिलिगुडीमध्ये २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.