'२००४ ते २०१४ हे इतिहासातले सर्वात वाईट दशक'; असं का म्हणाले पंतप्रधान मोदी?

आज झालेल्या लोकसभेतील भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला
'२००४ ते २०१४ हे इतिहासातले सर्वात वाईट दशक'; असं का म्हणाले पंतप्रधान मोदी?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आज जगभरातले अनेक देश कठीण काळातून जात असताना आपला देश प्रगतीपथावर आहे. मात्र काही निराशावादी लोक हे आजही निराशेतच बुडाले आहेत." असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की, '२००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातले सर्वात वाईट दशक होते," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "वर्ष २००४ ते २०१४ या दशकात भारतीय अर्थव्यवस्था चांगलीच ढासळली होती. या दहा वर्षात महागाई दोन अंकी झाली. त्यामुळेच काही चांगले झाले की या लोकांची निराशा वाढते. या लोकांनी बेरोजगारी दूर करण्याची आश्वासनं दिली होती त्यांनी फक्त त्यासाठीचे कायदे तयार केले. या दशकात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत होते. त्यांच्या काळामध्ये देश सुरक्षित नव्हता. त्या दशकात भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर इतका कमकुवत होता की, कोणीही ऐकायला तयार नव्हते. भारताचा आवाज जागतिक मंचावर कमकुवत झाला होता. यांच्या निराशेचे कारण हेदेखील आहे की आज देशाच्या क्षमतेचा परिचय जगाला होतो, तेव्हा यांना वाईट वाटते"

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, "त्या दशकात टेक्नॉलॉजी वाढत होती तेव्हा हे २जीमध्ये अडकून गेले. सिव्हिल न्यूक्लिअर डील झाली तेव्हा हे घोटाळ्यात अडकले. २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले, पण देशाचे नाव या कॉमनवेल्थ घोटाळ्यांमुळे बदनाम झाले. जगाभरात भारताची अब्रू गेली. कोळसा घोटाळाही यावेळी चर्चेत आला होता. २००४ ते २०१४ हे भारताच्या इतिहासातले घोटाळ्यांचे दशक होते." अशी टीका त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की, २००८ चा हल्ला आजही कुणीही विसरू शकत नाही. मात्र दहशतीला जशास तसे उत्तर देण्याची हिंमत त्यावेळेस कोणामध्येच नव्हती. आपल्या देशातल्या निरपराध लोकांचे रक्त विनाकारण वाहिले. हे दशक देशातले सर्वात वाईट दशक म्हणून ओळखले जणार आहे. तर २०२३चे दशक हे देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारे दशक ठरले, हे कोणीही नाकारू शकत नाही."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in