
नवी दिल्ली: केंद्र आणि राज्य सरकारांनी जर टीम इंडियाप्रमाणे एकत्रित काम केले, तर कोणतेही लक्ष्य गाठणे अशक्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नीती आयोगाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत केले.
'विकसित भारतासाठी विकसित राज्य २०४७' ही व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीची संकल्पना आहे. विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचे लक्ष्य आहे. जेव्हा प्रत्येक राज्य विकसित असेल तेव्हा भारत विकसित होईल, हीच १४० कोटी जनतेची आकांक्षा आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
किमान एक पर्यटनस्थळ विकसित व्हावे
प्रत्येक राज्य, प्रत्येक शहर, प्रत्येक नगरपालिका आणि प्रत्येक गाव विकसित करणे हे आपले लक्ष्य असले पाहिजे, जर आपण त्या दृष्टिकोनातून काम केले तर आपल्याला विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २०४७ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. जागतिक कीर्तीच्या सर्व सुविधा आणि पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असे किमान एक पर्यटनस्थळ प्रत्येक राज्यात विकसित झाले पाहिजे, असेही मोदी यांनी सुचविले. 'वन स्टेट, वन ग्लोबल डेस्टिनेशन'मुळे शेजारचे शहरही पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यास मदत होईल. भारतामध्ये झपाट्याने शहरीकरण होत असून आपण भविष्यातील सुसज्ज शहरांसाठी कार्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
महिलांचाही सहभाग हवा
विकास, नवी कल्पना आणि टिकावूपण ही भारतातील शहरांच्या विकासाचे इंजिन असले पाहिजे आणि महिलांचाही त्यामध्ये सहभाग असला पाहिजे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूरनंतर मोदी यांची सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच बैठक होती.