मशिदीवरून राजकीय वादंग

निलंबित तृणमूल काँग्रेस आमदार हुमायूं कबीर यांनी शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर येथे अयोध्येतील 'बाबरी मशीद-शैलीतील' मशिदीची पायाभरणी केली. अभूतपूर्व सुरक्षेत झालेल्या या कार्यक्रमामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच ध्रुवीकरण झालेल्या पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
मशिदीवरून राजकीय वादंग
मशिदीवरून राजकीय वादंग
Published on

बहरामपूरः निलंबित तृणमूल काँग्रेस आमदार हुमायूं कबीर यांनी शनिवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर येथे अयोध्येतील 'बाबरी मशीद-शैलीतील' मशिदीची पायाभरणी केली. अभूतपूर्व सुरक्षेत झालेल्या या कार्यक्रमामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच ध्रुवीकरण झालेल्या पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

हा कार्यक्रम ६ डिसेंबर या दिवशी जाणीवपूर्वक आयोजित करण्यात आला होता. राज्य पोलीस, आरएएफ आणि केंद्रीय दलांनी रेजीनगर आणि शेजारच्या बेलडांगाच्या मोठ्या भागाला 'नियंत्रित क्षेत्र' बनवले होते, ज्यामुळे परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था होती.

प्रस्तावित मशीद स्थळापासून सुमारे एक किलोमीटर दूर असलेल्या भव्य व्यासपीठावरून बोलताना, कबीर यांनी 'नारा-ए-तकबीर, अल्लाहु अकबर'च्या घोषणांदरम्यान उपस्थित धर्मगुरूंसोबत औपचारिक फीत कापली. यावेळी हजारो समर्थकांनी प्रतीकात्मक विटा घेऊन गर्दी केली होती.

कबीर म्हणाले, यात काहीही घटनाबाह्य नाही. प्रार्थनास्थळ बांधणे हा घटनात्मक अधिकार आहे. बाबरी मशीद बांधली जाईल, असा दावा त्यांनी केला आणि या कार्यक्रमाला चार लाख लोक उपस्थित होते, असे सांगितले. १९९२ च्या बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेचा संदर्भ देत, कबीर यांनी या प्रकल्पाला भावनिक भरपाई म्हणून चित्रित केले. ते म्हणाले, तेहतीस वर्षांपूर्वी मुस्लिमांच्या हृदयावर एक खोल जखम झाली होती. आज आम्ही त्या जखमेवर एक छोटासा मलम लावत आहोत. मशिदीची घोषणा केल्याबद्दल त्यांना धमक्या मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

राजकीय आरोप-प्रत्यारोप

भाजपने तृणमूल काँग्रेसवर कबीरपासून सार्वजनिकरित्या दूर राहूनही ध्रुवीकरणाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित मालवीय यांनी 'एक्स'वर आरोप केला की, हा प्रकल्प धार्मिक नसून राजकीय आहे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पश्चिम बंगालला गोंधळाकडे ढकलत आहेत. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, मुर्शिदाबादमध्ये 'मुघल पठाण राजकारणाचे' बीज पेरले गेले आहे आणि "आक्रमणकर्त्याचे" नाव मशिदीला देणे हा अपमान आहे.

तृणमूलचा बचाव

तृणमूल काँग्रेसने पलटवार करत निलंबित आमदार कबीर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक म्हणून काम करत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'एक्स'वर पोस्ट केलेः "बंगालची माती ही एकतेची माती आहे, ही भूमी विभाजनकारी राजकारणापुढे कधीच झुकली नाही आणि झुकणारही नाही. श्रद्धा वैयक्तिक आहे, पण उत्सव सर्वांचे आहेत.

काँग्रेसने तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोघांवरही धार्मिक चिंतांचा फायदा घेतल्याचा आरोप केला. काँग्रेसने कोलकात्यात 'सद्भावना रॅली' काढली आणि लोकांना विभाजनाचे राजकारण थांबवण्याचे आवाहन केले.

न्यायालयाचा हस्तक्षेप

कलकत्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुर्शिदाबादमधील बेलडांगा येथे अयोध्येच्या बाबरी मशिदीच्या धर्तीवर मशीद बांधण्याच्या कामात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पश्चिम बंगाल सरकारवर असेल, असे निर्देश दिले.

logo
marathi.freepressjournal.in