
नवी दिल्ली : धोकादायक प्रदूषणामुळे दिल्लीकरांचा जीव कासावीस झाला आहे. गेले महिनाभर दिल्लीतील एक्यूआय ४०० च्या वर गेला आहे. दिल्ली सरकार विविध उपाययोजना करत आहे. तरीही त्यात फरक पडत नाही. सर्वसामान्य माणसांप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आता दिल्ली नकोशी वाटत आहे. रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गडकरी यांनी प्रदूषणाबाबत मत मांडताना दिल्लीत राहायला आवडत नसल्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, राजधानी दिल्ली हे असे शहर आहे, जिथे मला राहायला आवडत नाही. येथील प्रदूषणामुळे मला संसर्ग होतो. मी प्रत्येक वेळी दिल्लीत येतो, तेव्हा मला असे वाटते की मी येथे येऊ नये, कारण येथे भयंकर प्रदूषण आहे. दिवसेंदिवस वाढणारी प्रदूषणाची पातळी कमी करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.
ते म्हणाले की, प्रदूषण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट होऊ शकते. भारत २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो, जे अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे. पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देऊन आपण जीवाश्म इंधनाची आयात कमी करू शकतो, असे ते म्हणाले.
गरिबी, उपासमार, बेरोजगारी भारताच्या मोठ्या समस्या
दरम्यान, भारतासमोरील सर्वात मोठ्या समस्या म्हणजे गरिबी, उपासमार आणि बेरोजगारी आहे. त्यामुळे आगामी काळात आर्थिक आणि सामाजिक समता साधण्याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.