राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पहिल्यांदाच राष्ट्राला संबोधित करताना देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच १९४७मध्ये झालेल्या फाळणीत प्राण गमावलेल्यांप्रति राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली.
स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, “७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मी देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते. १४ ऑगस्ट हा ‘फाळणी स्मरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा स्मृतिदिन साजरा करण्यामागचा उद्देश सामाजिक एकोपा, मानवी सबलीकरण आणि एकात्मता वाढवणे हा आहे. २०४७पर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करू, असा संकल्प आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपण वसाहतवादी राजवटीच्या बेड्या तोडल्या होत्या. त्या शुभदिनाची जयंती साजरी करताना आम्ही सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आदरपूर्वक अभिवादन करतो. आपण सर्वांनी स्वतंत्र भारतात श्वास घेण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. हा उत्सवाचा काळ आहे. घरोघरी तिरंगा मोहीम सुरू आहे. आज आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा अभिमानाने फडकत आहे. भारत दररोज प्रगती करत आहे.”
त्या म्हणाल्या की, “देशात सर्वांना समान अधिकार आहेत. बहुतेक लोकशाही देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला; परंतु आपल्या प्रजासत्ताकच्या सुरुवातीपासूनच भारताने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार स्वीकारला.
गेल्या वर्षीपासून प्रत्येक १५ नोव्हेंबर हा ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून पाळण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. आमचे आदिवासी सुपरहिरो हे संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत आहेत.” द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, “आज देशात आरोग्य, शिक्षण आणि अर्थव्यवस्था आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये चांगले बदल दिसून येत आहेत, त्याच्या मुळाशी सुशासनावर लक्ष केंद्रित करण्याची मोठी भूमिका आहे. भारताच्या नव्या आत्मविश्वासाचे उगमस्थान म्हणजे देशातील तरुण, शेतकरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातील महिला.