इलेक्ट्रिक दुचाकींच्या किमती १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
सुरक्षेचे कडक नियम आणि महागडा कच्चा माल यामुळे आता ईव्ही अर्थात विजेवरील दुचाकींच्या किमती वाढणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रिक दुचाकींच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.
उद्योगातील लोकांच्या म्हणण्यानुसार, दुचाकी कंपन्यांवर किमती वाढवण्याचा दबाव आहे. यापूर्वी अनेक इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना घडल्यानंतर सरकारने कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांना चांगल्या दर्जाच्या बॅटरी, सुटे भागआणि तंत्रज्ञानावर जास्त खर्च करावा लागणार आहे. याशिवाय, रशिया-युक्रेन युद्धानंतर उद्भवलेली परिस्थिती आणि चीनमध्ये कोरोना संसर्गाची नवी लाट यामुळे बॅटरी सेल आणि इतर घटकांची आयात महाग होत आहे. त्याच वेळी, आगीच्या घटनांनंतर दावे वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, काही विमा कंपन्यांनी ईव्ही दुचाकींच्या विम्याचे प्रीमियम वाढविण्याचा विचार सुरू केला.
दर वाढण्याचे कारण ...
भारतीय ई -दुचाकीमध्ये स्वस्त चीन निर्मित लिथियम आयन बॅटरी वापरतात, त्याऐवजी फेरो फॉस्फेट बॅटरी वापरणे अनिवार्य होण्याची शक्यता आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (बीएमएस) आणि आयसीएटीची मान्यता असलेल्या इतर सुरक्षा उपकरणांचा वापर अनिवार्य केल्याने खर्चावर परिणाम होईल. सरकारच्या कठोरतेनंतर गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक होणार. चांगल्या दर्जाचे सुटे भाग आणि बॅटरी वापरण्याव्यतिरिक्त सुरक्षा नियमांचे पालन केल्याने खर्चात भर पडेल आणि ईव्ही दुचाकींच्या किमती वाढू शकतात, असे ई-दुचाकी क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.