बॉश इंडियाच्या कार्यकाळाला १०० वर्षे पूर्ण, पंतप्रधानांनी केले कंपनीचे कौतुक
बॉश इंडियाच्या भारतातील कार्यकाळाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने या सोहळ्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे असे त्यांनी नमूद केले. याच कार्यक्रमात बॉश स्मार्ट कॅम्पसचे उदघाटन देखील करण्यात आले.
भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी भविष्यातील उत्पादने आणि सेवा विकसित करण्यात हा कॅम्पस नक्कीच अग्रस्थानी राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. जर्मनीच्या चॅन्सलर मर्केल यांच्यासोबत ऑक्टोबर २०१५मध्ये बेंगळुरू येथील बॉश सुविधा केंद्राला दिलेल्या भेटीचे स्मरण पंतप्रधानांनी केले.
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. भारताने गेल्या आठ वर्षात सौरऊर्जेची स्थापित क्षमता २० पटींनी वाढवली असून भारताचा विकास आता अधिक हरित होत आहे, असे त्यांनी सांगितले. बॉश कंपनीने भारतात आणि इतर देशांमध्ये कार्बन उत्सर्जनात संतुलन राखल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.