

दंतेवाडा : जेव्हा नक्षलवादी मारला जातो तेव्हा कोणालाही आनंद होत नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावे, जे आत्मसमर्पण करणार नाहीत त्यांना सुरक्षा दलाशी सामना करावा लागेल. शस्त्राच्या बळावर आदिवासींचा विकास रोखू शकत नाही. तुम्ही शस्त्रे टाका आणि मुख्य प्रवाहात या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. तसेच त्यांनी नक्षलवाद्यांना ‘भाऊ’ असे संबोधले. पुढच्या चैत्र नवरात्रीपर्यंत बस्तरमधील लाल दहशत संपवून टाकू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दंतेवाडा येथील बस्तर पंडुम महोत्सवाच्या समारोपात ते बोलत होते.
जेव्हा बस्तरमध्ये गोळ्या चालत होत्या, बॉम्बस्फोट होत होते, तो काळा आता गेला आहे. त्यामुळे ज्यांच्या हातात शस्त्रे आहेत आणि ज्यांच्या हाती शस्त्रे नाहीत त्यांनीही शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात यावे. तुम्ही आमचेच आहात, जेव्हा कधी नक्षली मारले जातात तेव्हा कुणाला आनंद होत नाही. परंतु परिसराचा विकास करायचा आहे जो मागील ५० वर्षांत झाला नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ वर्षांत बस्तरला सर्व काही देतील, असे शहा यांनी सांगितले.
तसेच बस्तरचा विकास तेव्हाच होईल जेव्हा इथे शांतता येईल, मुले शाळेत जातील, गावागावात आरोग्य सुविधा उभ्या राहतील, प्रत्येकाकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, आरोग्य कार्ड असेल, तेव्हाच बस्तरचा विकास होईल. जेव्हा बस्तरचे लोक स्वत: आपले घर, गाव नक्षलमुक्त करतील तेव्हाच हे शक्य आहे. कुणी कुणाला मारू इच्छित नाही. फक्त शस्त्रे सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात या. भारत सरकार आणि छत्तीसगड सरकार मिळून तुम्हाला सुरक्षा देईल. तुम्ही आदिवासी बांधवांचा विकास रोखू शकत नाही. विकासाच्या प्रक्रियेचा तुम्ही भाग व्हा, असे शहा म्हणाले.
दरम्यान, आज आम्ही नक्षलवादाविरोधात दोन्ही बाजूने पुढे जात आहोत. विकासासाठी हातात बंदुकीची आवश्यकता नाही. संगणकाची गरज आहे. ज्यांना समजले, विकासासाठी आयईडी, विस्फोटक नव्हे तर पेन हवा, त्यांनी आत्मसमर्पण केले आहे, २०२५ च्या चौथ्या महिन्यापर्यंत ५२१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. जे नक्षल चळवळ सोडणार नाहीत त्यांच्याविरोधात सुरक्षा दल कठोर कारवाई करेल. पुढील वर्षी मार्चपर्यंत संपूर्ण देश लाल दहशतीपासून मुक्त करण्याचे काम भाजप सरकार करेल, असा निर्वाणीचा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.
त्या गावांना एक कोटी रुपये
नक्षलमुक्त अभियानाची माहिती देताना अमित शहा म्हणाले की, जे जे गाव स्वतःला नक्षलमुक्त असल्याचे घोषित करतील त्या गावाच्या विकासासाठी एक कोटींचा निधी दिला जाईल. त्यामुळे तुमच्या गावातील नक्षलवाद्यांना आता आत्मसमर्पण करण्यास सांगा, असे आवाहन शहा यांनी केले.
८६ नक्षलवादी शरण
छत्तीसगडमधील सीपीआय (माओवादी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या ८६ नक्षलवाद्यांनी शनिवारी तेलंगणामधील भद्राद्री कोथागुडेम जिल्ह्यात आत्मसमर्पण केले. या वर्षी आतापर्यंत किमान २२४ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.