मतांसाठी मोदी स्टेजवरही नाचतील! नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती; बिहारच्या सभेत राहुल गांधींचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यमुना, छठ पूजा, यांच्याशी काहीही देणेघेणे नाही, तुम्ही सांगाल की मतांसाठी स्टेजवर नाचा, तर ते नाचतील, मतांसाठी ते काहीही करतील, असा हल्लाही गांधी यांनी चढविला.
मतांसाठी मोदी स्टेजवरही नाचतील! नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती; बिहारच्या सभेत राहुल गांधींचा घणाघात
मतांसाठी मोदी स्टेजवरही नाचतील! नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हाती; बिहारच्या सभेत राहुल गांधींचा घणाघातPhoto : X (Congress)
Published on

मुझफ्फरपूर/दरभंगा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्याचा वापर केला जात आहे, प्रत्यक्षात रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे, असा जोरदार हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे एका निवडणूक सभेत चढविला. राजदचे नेते तेजस्वी यादव हेही यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यमुना, छठ पूजा, यांच्याशी काहीही देणेघेणे नाही, तुम्ही सांगाल की मतांसाठी स्टेजवर नाचा, तर ते नाचतील, मतांसाठी ते काहीही करतील, असा हल्लाही गांधी यांनी चढविला.

बिहारमधील युवक निराश आहेत, मी जिथेही जातो तिथे बिहारचे युवक भेटतात, नितीश कुमार गेली २० वर्षे सत्तेत आहेत, पण त्यांनी काहीच केले नाही. बिहारच्या युवकांना त्यांच्या राज्यात संधी मिळत नाही. बिहारमध्ये बिहारच्या लोकांचे भविष्य नाही. तेजस्वी यादव बिहारला पुढे नेऊ इच्छितात, पण नितीश कुमार यांचा रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे. पंतप्रधान मोदी जातनिहाय जनगणनेवर काही बोललेच नाहीत, ते फक्त मतांसाठी काहीही करतील, असेही गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, नितीश कुमार स्वतःला अतिमागास म्हणवतात. पण गेल्या २० वर्षांत त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी काय केले आहे, तुम्हाला असे राज्य हवे का जेथे तुम्हाला काहीच मिळणार नाही, आम्हाला असा बिहार नको आहे, आम्हाला असा बिहार हवा आहे जेथे चांगले आरोग्य, शिक्षण आणि रोजगार उपलब्ध असेल.

भाजप सामाजिक न्यायाच्या विरोधात

राहुल गांधी म्हणाले की, भाजपला सामाजिक न्यायाशी काही देणेघेणे नाही. मी लोकसभेत पंतप्रधानांसमोर स्पष्ट सांगितले की जातनिहाय जनगणना करा, पण त्यांनी एक शब्दही बोलले नाही. भाजप सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे आणि ते ते होऊ देणार नाहीत.

मोदी छठ पूजा करू शकतील म्हणून दिल्लीतील यमुना नदीच्या काठी स्वच्छ पाण्याचा तलाव तयार करण्यात आला. यमुनेतील पाणी इतके घाण होते की कोणी प्यायले किंवा त्यात अंघोळ केली तर आजारी पडेल. पण मोदीजींना फक्त नाटक करायचे होते. म्हणून पाइपमधून स्वच्छ पाणी आणले गेले. टीव्हीवर तो पाइप दिसला आणि मोदीजींनी आपला कार्यक्रमच रद्द केला. त्यांना यमुना किंवा छठ पूजेशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त तुमचे मत हवे आहे. तुम्ही सांगाल की मतांसाठी स्टेजवर नाचा, तर ते नाचतील. मतांसाठी ते काहीही करतील.

गांधी यांनी पुन्हा एकदा वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले की, भाजपने महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये निवडणुका चोरी केल्या आहेत. ते बिहारमध्येही तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक ‘एसआयआर’च्या नावाखाली तेच करत आहेत. हे थांबवणे गरजेचे आहे. महागठबंधनच्या कार्यकर्त्यांनी बाहेर पडले पाहिजे. आम्ही असे सरकार बनवू ज्यात सगळे असतील, कुणाशीही भेदभाव होणार नाही.

तुमच्या फोनच्या मागे काय लिहिले आहे, ‘मेड इन चायना’, मोदीजींनी नोटबंदी आणि जीएसटी लागू करून लहान-मोठे सगळे व्यवसाय बरबाद केले. आता सर्वत्र ‘मेड इन चायना’ दिसते. पण आम्ही म्हणतो ‘मेड इन बिहार’ असावे. मोबाईल, शर्ट, पॅन्ट हे सर्व बिहारमध्ये तयार व्हावेत आणि बिहारच्या युवकांना त्या कारखान्यांमध्ये रोजगार मिळावा. आम्हाला असाच बिहार हवा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

ट्रम्प यांच्या दाव्यावर बोलण्याचे मोदींमध्ये धैर्यच नाही

राहुल गांधी म्हणाले की, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात जाऊन सांगतात की, त्यांनी नरेंद्र मोदींना घाबरवून ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले. ट्रम्प यांनी हे ५० वेळा सांगितले, पण मोदींच्या तोंडून एक चकार शब्दही निघाला नाही. मोदींमध्ये सत्य सांगण्याचे धैर्यच नाही. ट्रम्प रोज वेगवेगळ्या देशांत जाऊन मोदींचा अपमान करतात आणि मोदी एकदाही म्हणत नाहीत की, ट्रम्प खोटे बोलत आहेत. असा नेता देशाचा सन्मान कसा राखणार आणि असा माणूस बिहारचा विकास काय करणार, असा सवालही त्यांनी केला.

इंदिरा गांधींसारखी निर्भयता हवी

राहुल गांधींनी १९७१च्या भारत-पाक युद्धाचा उल्लेख करत म्हटले की, 'त्यावेळी अमेरिका भारताला धमक्या देत होती, पण इंदिरा गांधींनी ठामपणे सांगितले, ‘आम्ही तुम्हाला घाबरत नाही, खरे पंतप्रधान असे असतात. घाबरून जगणारे नेते देशाचे रक्षण करू शकत नाहीत. बिहारला असे नेतृत्व हवे, जे सत्य बोलेल, अन्यायाविरुद्ध उभे राहील आणि गरीबांच्या बाजूने निर्णय घेईल.

logo
marathi.freepressjournal.in