कोची : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केरळमधील कोची येथे आयोजित काँग्रेसच्या महापंचायतीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र टीका केली. भाजप आणि रा. स्व. संघ सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काँग्रेस पक्षाचा मूलभूत विचार सत्तेच्या विकेंद्रीकरणावर आधारित आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी आरोप केला की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकांचा आवाज दाबून काही मोजक्या कॉर्पोरेट घराण्यांना फायदा करून देत आहे. भाजपला देशातील लोकांनी शांत राहावे असे वाटते आणि केवळ निवडक कॉर्पोरेट घराण्यांनी प्रगती करावी, अशी त्यांची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व अधोरेखित
महापंचायतीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी, केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) मिळालेल्या यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका, सर्व स्तरांवर काँग्रेसने उत्तम कामगिरी केली आहे. पंचायती हा लोकशाहीचा तिसरा आणि सर्वात मजबूत पाया आहे. संविधानाचे संरक्षण करायचे असेल, तर पंचायती आणि नगरपालिकांचे संरक्षण करावे लागेल, असे ते म्हणाले.
घटनादुरुस्तीचा उल्लेख
राहुल गांधी यांनी आठवण करून दिली की, ७३आणि ७४वी घटनादुरुस्ती काँग्रेस पक्षानेच आणली, ज्यामागे एक व्यक्ती, एक मत आणि प्रत्येक भारतीयाला देशाच्या कारभारात आवाज मिळावा, ही भूमिका होती. मी पूर्ण खात्रीने सांगतो, केरळच्या लोकांचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केरळचे लोक आपला आवाज ठामपणे व्यक्त करतील.
नेतृत्व लोकांशी जोडलेले असावे!
राहुल गांधी म्हणाले की, कोणतेही सरकार यशस्वी व्हायचे असेल, तर नेतृत्व लोकांपर्यंत सहज पोहोचणारे आणि नम्र असावे. नेतृत्व लोकांमध्ये मिसळले पाहिजे. केरळच्या लोकांच्या आवाजाचे खरे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व यूडीएफ आणि काँग्रेस देईल, याची मला खात्री आहे.