राहुल गांधी हे ‘शाही जादूगार’; मध्य प्रदेशमधील सभेत नरेंद्र मोदी यांचा टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका फटक्यात गरिबी हटविण्याच्या केलेल्या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी खिल्ली उडविली.
राहुल गांधी हे ‘शाही जादूगार’; मध्य प्रदेशमधील सभेत नरेंद्र मोदी यांचा टोला

होशंगाबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका फटक्यात गरिबी हटविण्याच्या केलेल्या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी खिल्ली उडविली. हा ‘शाही जादूगार’ इतकी वर्षे कोठे होता, त्यांच्या आजींनी म्हणजेच इंदिरा गांधी यांनीही ५० वर्षांपूर्वी ‘गरिबी हटाव’ची घोषणा केली होती, याचेही स्मरण मोदी यांनी यावेळी करून दिले आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्याकडे कोणीही गांभीर्याने पाहात नाही, असे सांगितले.

मध्य प्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्यातील पिपरिया येथे एका जाहीरसभेत मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला हाणला. एका फटक्यात आपण गरिबीचे निर्मूलन करू शकतो, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्याचा संदर्भ मोदी यांनी दिला आणि राहुल गांधी यांच्याकडे कोणीही गांभीर्याने पाहात नाही, असे सांगितले.

राहुल गांधी यांनी गरिबीबाबत विधान केले. इंदिरा गांधी यांनीही ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता. त्याचे काय झाले याची जनतेला जाणीव आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

आण्विक नि:शस्त्रीकरण, इंडिया आघाडीवर टीका

इंडिया आघाडीतील एका पक्षाने आण्विक नि:शस्त्रीकरणास अनुकूलता दर्शविली असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. अशी मानसिकता असलेले देशाचे रक्षण करू शकत नाहीत, असे मोदी म्हणाले. सध्याच्या जगात आण्विक शस्त्रे गरजेची आहेत की नाही, असा सवाल मोदी यांनी जनतेला केला. आपल्या शत्रुराष्ट्रांकडे आण्विक सुसज्जता आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. देशाच्या रक्षणासाठी आपण अण्वस्त्रसज्ज असणे गरजेचे आहे, जे त्यासाठी अनुकूल नाहीत ते देशाचे रक्षण कसे करणार, असा सवालही मोदी यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in