राहुल गांधी यांनी घेतली शरद पवार यांची भेट ; पक्षाच्या कठीण काळात काँग्रेस सोबत असल्याचा दिला विश्वास

या सर्व घडामोडी शरद पवार यांच्या दिल्ली येथील जनपथ-6 या निवासस्थानी घडल्या
राहुल गांधी यांनी घेतली शरद पवार यांची भेट ; पक्षाच्या कठीण काळात काँग्रेस सोबत असल्याचा दिला विश्वास

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत आठ महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यात सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व नेत्यांनी शरद पवार हेच आमचे प्रमुख नेते, असा ठराव या बैठकीत मंजूर केला. तसंच पक्षविरोधी काम केल्याचं सांगत खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर प्रतिक्रिया दिली. या सर्व घडामोडी शरद पवार यांच्या दिल्ली येथील जनपथ-6 या निवासस्थानी घडल्या.

या बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोहबत हातमिळवणी केली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार ऍक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेतली आहे. ही बैठक संपल्यानंतर राहुल गांधी यांनी शरद पवारांची भेट घेतली.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. यावेशी शरद पवार यांच्या पक्षावर कोसळलेल्या या संकटात काँग्रेस सोबत आहे. असा दिलासा राहुल यांनी पवार यांना दिला. राहुल गांधी यांनी अजित पवार यांच्या शपथविधीच्या दिवशी देखील शरद पवार यांना फोन करुन विचारपूस केली होती. यानंतर त्यांनी आज प्रत्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी निवडणूक आयोगावर आमचा विश्वस असल्याचं सांगितलं. यावेळी निवडणूक आयोगाकडून न्याय मिळाला नाही तर आम्ही वेगळ्या ऑथिरिटीकडे जाऊ, पण तशी वेळच येणार नाही, असं पवार म्हणाले. यातून शरद पवार यांनी सुप्रिम कोर्टातही जाणार असल्याचे संकते दिल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीवर अजित पवार यांनी आक्षेप घेतला असून निवडणूक आयोग याबाबत योग्य निर्णय घेऊन असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in