
मुझफ्फरनगर: गुजरातमधील काही निनावी पक्षांना ४,३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ते समाजमाध्यमांवर शेअर करीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. या घटनेचा निवडणूक आयोग तपास करेल की प्रतिज्ञापत्र मागेल, असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी आयोगाला चिमटा काढला आहे.
आयोगाला चिमटा
भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतचोरी करत असल्याचे कथित पुरावे राहुल गांधी यांनी नुकतेच सादर केले होते. एका लोकसभा मतदारसंघातील संशयास्पद मतदारांची माहिती राहुल गांधी यांनी सादर केली होती. त्यानंतर देशभरातून निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त होऊ लागला होता. यावर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल यांना पत्राद्वारे उत्तर दिले होते. आयोगाने राहुल यांच्याकडे 'मत चोरी'च्या दाव्यांसंबधी त्यांची स्वाक्षरी असलेले शपथपत्र (प्रतिज्ञापत्र) सादर करण्यास सांगितले होते. त्याच घटनेच्या संदर्भाने राहुल यांनी आज निवडणूक आयोगाला चिमटा काढला आहे.
निनावी पक्ष
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, गुजरातमध्ये असे काही निनावी पक्ष आहेत ज्यांची नावे कोणीच ऐकलेली नाहीत. परंतु, त्यांना ४,३०० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या पक्षांनी फार कमी वेळा लहानमोठ्या निवडणुका लढवल्या आहेत किंवा त्यावर पैसे खर्च केले आहेत. हे हजारो कोटी रुपये कुठून आले, हे पक्ष कोण चालवतात, हे पैसे कोण देत आहे, पेसै कोणाच्या खिशात जात आहेत, निवडणूक आयोग याचा तपास करणार आहे का, की निवडणूक आयोग तपास करण्याआधी प्रतित्रापत्र मागेल का, की थेट कायदाच बदलेल ज्यामुळे हा डेटाही लपवता येईल.
दरम्यान, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार कुठल्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. राहूल यांचे म्हणणे आहे की, मी जे पुरावे सादर केले आहेत तो निवडणूक आयोगाने आम्हाला पुरवलेल्या माहितीचाच भाग आहे. त्यांनी मला दिलेल्या माहितीवरच मी स्वाक्षरी करून सादर करू का.
'त्यानंतर' अवघ्या पाच तासांत युद्ध थांबविले
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध अवघ्या पाच तासांमध्ये थाबविल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी येथे केला. भारत-पाकिस्तान युद्धाने परिसीमा गाठली असताना ट्रम्प यांनी मोदी यांना फोन केला आणि २४ तासात युद्ध थाबंविण्याचा आदेश दिला व त्याचे मोदींनी पालन केले,. ट्रम्प यांनी २४ तासांची मुदत दिली होती, मात्र मोदी यांनी अवघ्या पाच तासातच ते थांबविले, असेही गांधी म्हणाले.