काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी महिला आरक्षणावरुन सरकारला लक्ष्य करत सरकार लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. महिला आरक्षण विधेयकाची अंमल बजावणी करायची असेल तर आताच करावी, त्यासाठी सीमांकन कशासाठी? महिला आरक्षण विधेयकाची आजपासून अंमलबजावणी होऊ शकते, असं राहुल गांधी म्हणाले.
यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हे विशेष अधिवेशन का बोलावलं जात आहे? हे आधी कळलं नाही. नंतर महिला आरक्षणासाठी बोलावलं असल्याची माहिती मिळाली. महिला आरक्षण चांगली बाब आहे. पण त्यात दोन कमतरता आहेत. सर्वात पहिली म्हणजे. आरक्षण लागू करण्यापूर्वी जनगणना आणि सीमांकन करावं लागेल आणि या दोन्ही गोष्टी करण्यासाठी बरीच वर्ष लागतील, असं सांगितलं जात आहे. पण सत्य हे आहे की, महिला आरक्षण आजपासून लागू केलं जाऊ शकतं.
लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के जागा दिल्या जाऊ शकतात. पण सरकारला तसं करायचं नाही. सरकारनं विधेयक मंजूर केलं आहे. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी १० वर्षांनी होणार आहे. एवढंचं नाहीतर, ते होणार की नाही हे देखील माहिती नाही. असं राहुल गांधी म्हणाले.
यावेळी बोलताना राहुल यांनी ओबीसींच्या मुद्यावर देखील आपलं मत मांडलं. ते म्हणाले की, पंतप्रधान म्हणतात की ते ओबींसींसाठी खूप काम करत आहेत. खरंच ते ओबीसींसाठी एवढं काम करत असतील तर ९० पैकी तीनच लोक ओबीसी समजातील का? भारताच्या बजेटच्या फक्त ५ टक्के भाग ओबीसी कंट्रोल करत आहेत. भारतातील ओबीसींची लोकसंख्या फक्त ५ टक्के आहे का? असा प्रश्न मी संसदेत विचारला असता त्यांनी उत्तर दिलं की, लोकसभेत आमचे प्रतिनिधी आहेत, पण याचा त्याचा काय संबंध ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.