

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये 'जनादेशाची चोरी' झाल्याच्या ममता बॅनर्जींच्या आरोपाला पाठिंबा दर्शवला. देशातील लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोहिम आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उचललेले मोठे पाऊल असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.
गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, "काँग्रेसमधील काही लोक आणि इतरही काहीजण तृणमुलच्या पराभवाचा आनंद साजरा करत आहेत. त्यांनी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की, आसाम, बंगालमध्ये जनतेच्या जनादेशाची झालेली चोरी ही भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपाच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे. त्यांनी पुढे म्हटले की, क्षुद्र राजकारण बाजूला ठेवा. हा मुद्दा कोणत्याही एका पक्षाचा नसून भारताचा आहे.
ममतांची मोठी चूक - राऊत
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे न ऐकणे आणि त्यांच्याशी युती किंवा आघाडीबाबत चर्चा न करणे ही पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मोठी चूक होती. जर त्यांनी चर्चा केली असती, तर विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगळे असते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दिली. राऊत यांनी दावा केला की, पश्चिम बंगालमधील भाजपचा विजय हा लोकशाहीचा विजय नाही. 'विशेष सघन पुनरीक्षण' प्रक्रियेद्वारे लाखो मतदारांची नावे वगळण्यात आली होती. ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टालिन यांसारख्या प्रमुख विरोधी नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला, तरी 'इंडिया' आघाडीचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे, असेही राऊत म्हणाले.