काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर राहुल या यात्रेचा दुसरा टप्पा काढणार असल्याचे देखील बोलले जात होते. आता काँग्रेस या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु करणार असून त्याला ‘भारत न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. ईशान्यतील मणिपूर ते मुंबई असा या यात्रेचा प्रवास असणार आहे. ही यात्रा 14 राज्यांतून जात 6,200 किमी अंतर पार करणार आहे.
‘भारत न्याय यात्रा‘ मणिपूरमधून 14 जानेवारीपासून सुरु होणार असून 20 मार्च रोजी मुंबईत या यात्रेचा समरोप होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. मात्र, या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करणार की आणखी कोणी? याबाबत काँग्रेसकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अशी असणार ‘भारत न्याय यात्रा’
ही यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. यात मणिपूर, नागालँड, आसाम, मेघायल, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.
का दिले ‘भारत न्याय यात्रा’ नाव?
या यात्रेचे ‘भारत न्याय यात्रा’ असे नाव का ठेवले, हे देखील काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.” आम्ही जनतेला आर्थिक, सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ, असे आश्वासन या यात्रेच्या माध्यामातून देऊ इच्छितो, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. यामुळे या यात्रेला ‘भारत न्याय यात्रा’ नावे देण्यात आले आहे.